जी एंची पत्रवेळा उघडलं आज दुपारी असच... कवी ग्रेस यांना ज एंनी लिहिलेली पत्रे यात आहेत. खूप खूप कमी वाचलं आहे मी जीएंनी लिहिलेलं, तेही कोणी असच सुचवलं म्हणून.
काजळमाया, पिंगळावेळ, सांजशकून यातल्या कथा...पण पुढे आणखी वाचत नाही राहू शकले. त्यांनी लिहिलेलं वाचण्याची ताकद आणि समज इतकी स्वस्त, सहज जिकडे तिकडे कुठे मिळायला. त्यांच्या लेखनाचा गाभितार्थ स्वतःत पचवायला वाचकही एका वेगळ्याच मानसिकतेचा हवा. 'वेगळ्याच' हा खूप बहु अर्थी शब्द आहे खरंतर, आपण भिजवू त्या भावनेत भिजणारा... पण तरीही इथे मला अपेक्षित असलेला त्या वेगळेपणाचा अर्थ त्यांचं लेखन वाचणाऱ्या, पेलणाऱ्या आणि relate करू शकणाऱ्या वाचकांच्या तितक्या संवेदनशील मानसिकतेपर्यंत जाणारा आहे.
त्यांनी लिहिलेल्या पैकी मी ज्या काही कथा वाचल्या त्या समजून घेताना जीएंच्या असामान्य प्रतिभेची मला केवळ ओळखच होवू शकली. ती गोष्ट, त्यातली पात्र, गोष्टीत दिसणारा भोवताल, त्याची तुलनात्मक विषेषणं, आणि ते सगळं गोष्टीत उभारताना त्यांची वाचकाला वास्तविक पण तरीही नेणिवेच्याही पल्याड नेणारी मानसिकता, (असं कसं काय कोणी विचार करू शकतं, हे कसं सुचू शकतं) हे सगळं दैवी प्रतिभेशिवाय कसं शक्य आहे हेच सारखं वाटत राहतं. सगळं अर्थशून्य आहे हे नुसतं म्हणायला माहीत असतं पण त्या सत्यापर्यंत बोट धरून घेवून जाणारं त्यांचं लिखाण आतून खूप अस्वस्थ करत रहातं. आणि एका क्षणी ते खूप असह्य होतं की ते पेलवत नाही... मगाशी चार दोन कथाच वाचू शकले, तेवढ्यावरच थांबले ते म्हटलं ते हे असह्य वाटणं मला पेलू न शकल्यामुळेच अगदी.
म्हणूनच त्या कथांमधून त्यांच्या प्रतिभेची केवळ ओळखच मला होवू शकली... पूर्ण समजून रिचवता नाही आले त्यांचे लेखन पण निदान एक व्यक्ती म्हणून जीए कसे असतील, एरवी माणसांपासून अलिप्त राहणारे जीए त्यांच्या जिवलग म्हणवणाऱ्या, कधी घरातल्या तर कधी नात्याच्या ना गोत्याच्या पण वैचारिक ओढीने जवळ आलेल्या, बांधल्या गेलेल्या लोकांबरोबरच्या मैत्री सारख्या तरल नात्यात कसे असतील हे त्यांच्या व्यक्तिमत्त्वातलं अंग जाणून घेण्यासाठी मला त्यांनी इतर लेखक कवी मित्रांना लिहिलेली पत्रे वाचावीत असं वाटलं आणि ही पत्रवेळा लगेच घेतली. मागे वाचलेले सुनीता बाईंचे 'प्रिय जीए' ही आठवले. त्यांनी जीएंना लिहिलेली खूप मार्मिक पत्रे त्यात वाचायला मिळाली आणि मैत्रीच्या नात्याबरोबर त्यांच्यातील पत्राद्वारे झालेल्या साहित्यिक गप्पा अनुभवायला मिळाल्या... !
तसाच सुंदर ठेवा या 'जीएंची पत्रवेळा' मध्ये आहे... त्यांनी कवी ग्रेसांना लिहिलेली पत्रे यात आहेत. काही मोठी, काही छोटी, काही असच मन मोकळं करत मित्राला लिहावं वाटलं म्हणून लिहिलेली, काही आधीच्या पत्रांची उत्तरं म्हणून लिहिलेली अशी कवी ग्रेस यांच्यासाठीची ही जीएंची पत्रे... ग्रेसांच्या अनपेक्षित उत्तरामुळे झालेला आनंद ही काही पत्रात जीएंनी अगदी मनापासून व्यक्त केला आहे. ग्रेसांबद्दल त्यांच्या कवितांबद्दल, पत्रांबद्दल जीएंना 'माहेरमाया' वाटे.. हा शब्द मला खूप भावला... आपल्या नकळत आपल्या आतड्यातून कोणासाठी काही दाटून यावं इतकी भरभरून माया या शब्दात भरली आहे असं वाटलं. जीएंना आयुष्यात मित्र म्हणून ही सगळी प्रगल्भ माणसं लाभली हा त्यांच्यामते सगळा सुदैवी योगायोग. आयुष्यभर टिकणारे आणि आयुष्याला सुखावणारे कृतज्ञतेचे संबंध निर्माण होणे हा सुरेख योगायोगच नाहीतर काय.
मोकळेपणी मनातले मांडण्यासाठी या अशा स्नेह्यांशिवाय दुसरा खण तो कुठला असणार, इतक्या अपलेपणी त्यांनी त्यांच्या जिवलग मित्रांना ही सारी पत्रे लिहिली आहेत. या पत्रांमुळे मी खूप घडत गेलो असेही ते म्हणतात.
ग्रेसांच्या बऱ्याच कविता, त्यांचे शब्द त्यातल्या सुरेल सच्चेपणामुळे जीएंच्या अगदी जिभेवर रेंगाळत राहणारे होते अस ते म्हणतात आणि तरीही एक कविता वाचताना मात्र एक दोन ठिकाणी त्यांना गोंधळल्यासारखे झाले त्याबद्दल ते ग्रेसांना लिहितात, "ती कविता वाचताना मला वाटले, की आपले बोलणे इतरांना समजत नाही, हे ठीक, पण इतरांचे जिवंत, सुगंधी शब्द समजून न येण्याइतका मी एकाकी झालो की काय? Do I understand myself? हे वाचताना मलाच 2 मिनिटे थबकायला झाले. किती सहज नि किती खरेपणी मैत्रीतला संवाद होत असतो.
ग्रेसांच्या पहिल्या काव्यसंग्रहावर जीएंनी लिहिलेली प्रतिक्रिया त्यांनी एका एका पत्रातून ग्रेसांना कळवली हे ते म्हणतात, "गडद, दाट हिरव्या अंधारात दिसणाऱ्या अस्पष्ट झाडांमधून आत आत हा प्रवास आहे, आणि त्या झाडांना एकेक नाव देता ती स्पष्ट होत जातील..."
कावळा या ग्रेसांच्या कविते बद्दल त्यांची प्रतिक्रिया मांडताना एका पत्रात जी एंनी भरभरून लिहिलंय, "कावळा हा विलक्षण पक्षी, निःसंशय काळा रंग असूनही त्याच्या बसण्यात किंवा हालचालीत कधी खंत किंवा ओशाळेपणा नाही, मी आहे अशी निर्विकार स्थिर जाणीव आहे आणि भारद्वाजाकडे पाहता, तो मात्र एकदम बिचकतो, बावरतो, आपण फार भडक तर दिसत नाही ना हा बुजरेपणा त्याच्यात आहे." अशा आशयाचे त्या कवितेबद्दल आणखीही खूप काही सविस्तर त्यांनी लिहिले आहे.
'विशाल उग्र श्र्वापदा प्रमाणे वाटणाऱ्या आयुष्याने मध्येच एक डोळा उघडून आपल्याकडे रोखून पहावे तसा अनुभव देणारी तुमची कविता ' असं ते एका पत्रात ग्रेसांना लिहितात.
बाकीही असेच खूप संदर्भ आहेत जे वाचताना भारावून जायला होतं. त्यांच्या कथांमधून जीए जितके गूढ वाटतात तोच गूढपणा त्यांच्या पत्रांमधून ही डोकावतो. खूप गोतावळा भोवती नाही पण जिव्हाळ्याची चार माणसे जोडीत, त्यांना भरभरून जीव लावत जगण्याची आसक्ती त्यांच्या पत्रांमध्ये जाणवते.
वैयक्तिक पातळीवर हा माणूस कसा असेल हे खूपसे स्पष्ट नाही होऊ शकत पण अथांग सागराच्या तळाशी दडलेला त्यांच्या मनाचा तो गूढ भाव तसाच गूढ राहतो. पत्र ही दोन माणसांमधली इतकी जिव्हाळ्याची गोष्ट असूनही त्यांच्या मनाच्या तळाचा या पत्रांमध्येही ठाव लागतोच असे नाही.
कवी किंवा लेखक ज्या कविता, लेख, गोष्टी प्रसिद्ध करतात, तेवढ्यावरच इतरांनी बोलावे, तेवढ्याच खिडक्या उघड्या ठेवण्याचा त्यांचा हक्क आहे. पण त्यांची ही निर्मिती त्यांच्या खाजगी आयुष्यातून, भोगांतून निर्माण झालेली असते, त्यांच्या अनुभवांचे त्यांच्या मनावर उमटलेले रंगीबेरगी डाग, सतत त्रास देणारे आतले कसले तरी वादळ, अस्वस्थता त्यातून कागदावर उतरलेली ती निर्मिती असते हे वाचक जाणतो, त्यामुळं तो लेखक व्यक्ती म्हणून कसा असेल ही थोडीशी तरी उत्सुकता असते... अर्थात मला आहे. त्यामुळंच मी पुलंची लोकप्रिय विनोदी पुस्तके वाचल्यानंतर 'आहे मनोहर तरी' वाचलेले. सुनीता बाईंचे लिखाण समजून घ्यावे म्हणून नाही तर पुलं हे व्यक्ती म्हणून त्यांच्या अर्धांगिनीच्या नजरेत कसे आहेत हे जाणण्यासाठी. तसेच मागे गौरी देशपांडेचेही (मला) खूप practical वाटणारे लिखाण वाचलेले. लेखकाच्या लिखाणावरून त्या निर्मिती मागच्या प्रेरणा काय असतील, इतकं दुःखद लिहिणाऱ्या लेखकाला (हे स्पेसिफिक जीएंबद्दल) त्यांनी भोगलेल्या वेदनेविषयी अपार आसक्ती आणि म्हणूनच आपुलकी असणार, त्या अर्थाने ते जाणून घ्यायची ओढ.
कवी किंवा लेखक ज्या कविता, लेख, गोष्टी प्रसिद्ध करतात, तेवढ्यावरच इतरांनी बोलावे, तेवढ्याच खिडक्या उघड्या ठेवण्याचा त्यांचा हक्क आहे. पण त्यांची ही निर्मिती त्यांच्या खाजगी आयुष्यातून, भोगांतून निर्माण झालेली असते, त्यांच्या अनुभवांचे त्यांच्या मनावर उमटलेले रंगीबेरगी डाग, सतत त्रास देणारे आतले कसले तरी वादळ, अस्वस्थता त्यातून कागदावर उतरलेली ती निर्मिती असते हे वाचक जाणतो, त्यामुळं तो लेखक व्यक्ती म्हणून कसा असेल ही थोडीशी तरी उत्सुकता असते... अर्थात मला आहे. त्यामुळंच मी पुलंची लोकप्रिय विनोदी पुस्तके वाचल्यानंतर 'आहे मनोहर तरी' वाचलेले. सुनीता बाईंचे लिखाण समजून घ्यावे म्हणून नाही तर पुलं हे व्यक्ती म्हणून त्यांच्या अर्धांगिनीच्या नजरेत कसे आहेत हे जाणण्यासाठी. तसेच मागे गौरी देशपांडेचेही (मला) खूप practical वाटणारे लिखाण वाचलेले. लेखकाच्या लिखाणावरून त्या निर्मिती मागच्या प्रेरणा काय असतील, इतकं दुःखद लिहिणाऱ्या लेखकाला (हे स्पेसिफिक जीएंबद्दल) त्यांनी भोगलेल्या वेदनेविषयी अपार आसक्ती आणि म्हणूनच आपुलकी असणार, त्या अर्थाने ते जाणून घ्यायची ओढ.
एक मात्र नक्की ही सगळी पत्रे दोन दिग्गज प्रतिभावंतांमधला सुरेख मैत्रीचा धागा उलगडतात आणि वाचनाचा सुखद आनंद देतात.
खूप random, वाटेल तसं अस्ताव्यस्त लिहिलेलं आहे. मन असे मोकाट फिरेल तिकडे उधळून दिले आहे... !
--- अश्विनी वैद्य
२०.०३.२०

No comments:
Post a Comment