Monday 30 March 2020

अर्थकारण जाणून घेताना...!


सध्याच्या करोनाच्या quarentine परिस्थिती मध्ये social distancing पाळण्याची जबाबदारी पार पाडताना social मीडियाशी आपलं distancing मात्र खूप कमी आपोआपच झालं. 
सक्तीने घरात बसून बराच रिकामा वेळ मिळायला लागला तेव्हा हे डिस्टंसिन्ग अजूनच कमी झालं... माझं तरी नक्कीच झालं. जगात कुठे जरा खुट्ट वाजलं की पुढच्या क्षणाला व्हाट्सएप वर टुंग आवाज येतो नोटिफिकेशन चा... त्या मेसेजची विश्वासार्हता वैगेरे गोष्टी हा वेगळा मुद्दा आहे, पण हे distancing कमी झालंय हे जास्तच जाणवायला लागलं. या कोरोनाच्या भयावह परिस्थिती निमित्ताने बरेच लेख वाचायला मिळाले, बऱ्याच देशांमध्ये lockdown जाहीर झाल्याने जागतिक अर्थव्यवस्थेवर झालेल्या परिणामावर पण प्रसारमाध्यमांतून भरपूर काही ऐकायला वाचायला मिळालं. या कोरोनाच्या लढयापुढे विकसित देशांची ज्यांची लोकसंख्या भारताच्या लोकसंख्येपुढे अगदीच काहीशी आहे अशा इंग्लंड, जर्मनी, स्पेन सारख्या देशातही अपुऱ्या सुविधांमुळे, वेळीच सतर्क न झाल्यामुळे व्यवस्था कोलमडून गेल्यात जमा झाली. तिथे आपल्या भारतासारख्या विकसनशील देशाची व्यवस्था कशा पद्धतीने उभी राहील, एकूण देशाची आजवरची आर्थिक रचना कशी होती हे समजून  घ्यावे वाटले. 


कोरोनाच्या या परिस्थितीमुळे जागतिक अर्थव्यवस्थेत झालेला एकूण परिणाम बघता आणि भारतासारखा इतका विशाल देश जिथे पूर्वी सोन्याचा धूर निघत होता हे केवळ ऐकत आपण मोठे झालो तो, संस्कार, परंपरा आणि संस्कृती यांनी प्रचंड समृद्ध असलेला आपला देश कायम विकसनशील अवस्थेतच का अडकलेला राहिला, असे बाळबोध प्रश्न मला पडले. सगळ्याच्या मागे अर्थकारणच असते म्हणून मग त्या अर्थकारणावर अगदी बेसिक तरी माहिती शोधण्याचा प्रयत्न केला. ज्या जागतिक अर्थव्यवस्थेचा आपण प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष रित्या भाग आहोत त्याची किमान ओळख असण्याबद्दल पण आपली प्रचंड उदासीनता असते त्या आधारावर आपल्या देशाचे पर्यायाने जगाचे अर्थकारण नक्की काय असते, त्या मागची भूमिका, त्याचा इतिहास, त्यातले संदर्भ हा भाग जो इतकी वर्ष माझ्यासाठी पारच दुर्मुखलेला होता त्याच्याकडे नीट समजून घेण्याच्या दृष्टीने माहिती शोधायला सुरुवात केली. त्यातील मला मिळत गेलेल्या माहितीतून मला सापडलेले संदर्भ आणि महत्वाचे वाटलेले काही मुद्दे इथे मांडत आहे. 

पैसे हे देवघेव करण्याचं वैश्विक माध्यम आहे. त्यामुळं सर्वात आधी चलन म्हणजे काय, त्याची किंमत नक्की कशाच्या आधारावर ठरते, कोणत्या देशाने त्यांचे किती चलन छापायचे हे कसे ठरते.. हे पुन्हा नीट समजून घेतेले. या अनुषंगाने नुकत्याच वाचलेल्या sapiens पुस्तकातले काही मुद्देही आधाराला आले. 'पैसे म्हणजे नाणी किंवा नोटा नव्हेत. वस्तूंची किंवा सेवांची देवघेव करण्याच्या हेतूने इतर वस्तूंची किंमत पद्धतशीर रित्या ठरवून ती चलन म्हणून वापरली जाते. नाण्यांचा शोध लागण्यापूर्वी शंख, शिंपले, मणी, कवड्या वैगेरे गोष्टी चलन म्हणून वापरल्या जात होत्या. नंतर नाणं म्हणजे ठसा उमटवलेला धातूचा तुकडा याचा वापर चालू झाला.. भारतातल्या राज्यकर्त्यांनी स्वतःची नाणी पाडली. मुस्लिम व्यापारी आणि युरोपीय व्यापारी यांनी नाणे व्यवस्था जगाच्या कानाकोपऱ्यात पसरवली. 


आजचे प्रचलित चलन नोटा आणि नाणी. सेपियन्स पुस्तकात आलेल्या संदर्भानुसार सध्या जगातला एकूण पैसा साठ ट्रिलियन डॉलर इतका आहे. पण तरीही नाण्यांची आणि नोटांची संख्या ही सहा ट्रिलियन डॉलर पेक्षा कमी आहे. एकूण पैशाच्या ९० टक्के पैसा हा फक्त इलेक्ट्रॉनिक रूपात कॉम्पुटर सर्वर वरच अस्तित्वात आहे. पैसा म्हणजे भौतिक वास्तव नाही ती एक मानसिक रचना आहे, जेव्हा सामायिक कल्पनाशक्तीवर लोकांचा विश्वास असतो तेव्हाच पैसा ही संकल्पना यशस्वी होऊ शकते. टांकसाळीतून बाहेर पडणाऱ्या सर्व प्रकारच्या पैशासाठी 'विश्वास' हा कच्चा माल असतो, त्यामुळे दोन अपरिचित व्यक्तींमध्येही चलनावरच्या विश्वासामुळे व्यापार होणे शक्य होते. 


पूर्वी एखाद्या देशाने किती चलन छापायचे हे त्यांच्याकडे असलेल्या सोन्याच्या साठ्यावरून ठरायचे, पण १९३० साली जी पहिली आर्थिक मंदी आली तेव्हा हे गोल्ड स्टँडर्ड बाजूला पडले. त्यानंतर कोणताही देश त्याच्या गरजेच्या प्रमाणात चलन छापू शकतो, पण याचा अर्थ असा नाही की देशाची गरिबी दूर करण्यासाठी कितीही नोटा छापू शकतो. एखाद्या देशाने त्यांचे चलन गरजेपेक्षा जास्त छापले तर त्या देशात inflation वेड्यासारखे वाढते, लोकांना तीच गोष्ट विकत घेण्यासाठी जास्त पैसे खर्च करावे लागतात, आणि चलनाची किंमत कमी होते. यासाठी साधारण ठोकताळा असा की, विकसित देशातील सेंट्रल बॅंक त्यांच्या देशाच्या एकूण GDP च्या २ ते ३ टक्के चलन छापतात आणि भारतासारखे विकसनशील देश त्यापेक्षा थोडे जास्त छापतात. 


या चलनाच्या उगम आणि प्राथमिक माहिती नंतर त्याच्या मूल्यांकनाबद्दल माहिती पहिली त्यानिमित्ताने शिवाजी महाराजांच्या काळातील एक किस्सा, या संदर्भाने आला. एकदा शिवाजी महाराजांना इंग्रजांचं देणं रोखीत द्यावं लागणार होतं, तेवढी रोख तेव्हा त्यांच्याकडे नव्हती म्हणून मग ती चांदीच्या रूपात देण्याचे ठरले, त्यावेळी महाराजांनी २४ तासात त्या भागातल्या चांदीच्या किमती जवळपास दुपटीने वाढवल्या. हे स्वराज्याचे कार्य होते, पण अशा पद्धतीने चलनाची किंमत ही manipulate करता येते, हा दुर्लक्षिलेला इतिहास त्यांच्या लढायांइतकाच आपल्याला माहित असणे किती महत्वाचे होते, पण ते झाले नाही. असो. 

लोकसत्ताचे संपादक, गिरीश कुबेर यांनी त्यांच्या वेगवेगळ्या भाषणांमधून मांडलेल्या मुद्दयंमध्ये खालील विचार ऐकायला मिळाले.  हे मुद्दे तपशीलवार माहिती आधारे असल्याने त्याची विश्वासार्हता निःसंशय आहे.

महाराष्ट्राच्या भूमीत आणखी दोन व्यक्तींनी मांडलेले अर्थकारण विषयक विचार ही इतिहासाकडून तितकेसे प्रकाशात आले नाही. ते म्हणजे, लोकमान्य टिळक आणि बाबासाहेब आंबेडकर. १८७६ साली दादाभाई नौरोजी यांनी सर्वप्रथम भारताच्या अर्थव्यवस्थेबद्दल लिहिले. त्या आधी या विषयावर भारताबाबत कोणीही लिहिले नव्हते. १८९२ साली टिळकांनी केसरी मधून चलन यावर सर्वप्रथम लिहायला सुरुवात केली. चलनाचं मूल्यांकन कसं ठरतं, काहीच घडलं नाही तरी पौंड आणि रुपये हा दर कसा काय बदलतो. या सगळ्याचे अभ्यासपूर्ण लेख त्यांनी त्या काळी देश पारतंत्र्यात असताना केसरीतून लिहिले. चलनाचं महत्व जाणलं आणि लोकांना ते पटवण्याचा पोटतिडकीने प्रयत्न केला. टिळकांनी त्यावेळी मांडलेले एक वाक्य 'जर्मन हा महासत्ता होण्याचे मूळ त्यांच्या लघु उद्योगात आहे ' या आणि अशा अर्थजाणिवा, त्या काळी जेव्हा कोणतीही माहितीची नीटशी साधने उपलब्ध नव्हती अशा काळी त्यांची अर्थव्यवस्थे बाबत असलेली  दूरदृष्टी ही बाब खूप अतुलनीय आहे. 


त्याच दरम्यान महादेव गोविंद रानडे (उंच माझा झोका मालिकेतून ज्यांचे चरित्र दाखवण्यात आले ते) यांची चलन आणि अर्थकारण या संदर्भात चार मोठी व्याख्याने पुण्यात झाली. टिळकांनी शेतीविषयकही अर्थविचार मांडले. ते भारतातले पहिले ऍग्रो इकॉनॉमिस्ट होते. आणि त्यानंतर डॉ. आंबेडकर. 'भारतात जर शेतीची प्रगती साधायची असेल तर औद्योगिकरणास पर्याय नाही' हा आंबेडकरांचा विचार आजही आपल्या देशाच्या आर्थिक प्रगतीसाठी लागू पडतो. इंग्लंडमध्ये लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये अर्थविषयक शिक्षण घेत असताना त्यांनी एलएलबी बरोबरच आणखीही इतर पदव्या संपादन केल्या आणि १९२० पर्यंत त्यांचे अर्थविषयक विचार अतिशय प्रगल्भ झालेले होते. त्यामुळे टिळकांचे चलनविषयक विचार आंबेडकरांनी प्रचंड ताकदीने इंग्लंडमध्ये असताना मांडले कि त्याच्या आधारे इंग्लंड सरकारला भारतीय चलनाचे मूल्य ठरवण्यासाठी एक आयोग नेमावा लागला त्या आयोगातून एका संस्थेचा जन्म झाला तिचं नाव रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. 


दुसऱ्या महायुद्धांनंतर Bretton Woods ला एक परिषद भरली, जगातील महत्वाच्या देशांचे प्रमुख त्या परिषदेमध्ये जमले होते. त्या परिषदेतून दोन संस्था जन्माला आल्या, एक म्हणजे जागतिक बँक (वर्ल्ड बँक) आणि दुसरी IMF (इंटरनॅशनल मॉनिटरी फंड). त्यातल्या वर्ल्ड बँकेचे तेव्हा पासूनचे आजवरचे सगळे प्रमुख हे केवळ अमेरिकी आणि IMF चे सगळे प्रमुख हे युरोपीयच आहेत. हा त्या संस्थांचा एक अलिखित नियमच आहे. त्या परिषदेत आणखी एक निर्णय घेतला गेला तो असा कि, जागतिक चलन हे डॉलर्स च असेल. म्हणजे जगातील कोणतेही दोन देश ज्यांचे चलन डॉलर नाही हे एकमेकांशी कोणताही आर्थिक व्यवहार करतात तेव्हा तो डॉलर मध्येच होतो. आणि डॉलर वर ते जागतिक चलन असूनही ते छापण्यावर अधिकार केवळ अमेरिकेचाच. इतर कोणत्याही देशाला तो नाही. जेव्हा एखाद्या देशाकडे चलन जास्त होतं तेव्हा तो देश डॉलर खरेदी करून तो ठेवून देतो आणि जेव्हा चलन कमी पडतं तेव्हा तो डॉलर विकून बाजारपेठेतून पैसा उभा करतो. या असमान व्यवस्थेचा परिणाम असा होतो कि, काही झालं तरी डॉलरचेच भले होते, काही नाही झाले तरी डॉलरचेच भले होते. या सगळ्यामुळे अमेरिकेला जागतिक बाजारपेठेवर कायम नियंत्रण ठेवता येते. थोडक्यात काहीही झालं तरी फायदा अमेरिकेचाच होतो. मग या अमेरिकी अर्थव्यवस्थेवर संताप व्यक्त करण्याच्या हेतूने दहशतवाद उदयास आला. जे देश अमेरिकेला भिडले त्या सगळ्या देशांना दहशतवादाचा फटका बसला. 


जगात आजवर झालेली धार्मिक युद्ध/ बंड यामागची कारणं ही केवळ अर्थकारणाशी निगडीतच होती. कम्युनिझमला आळा बसवायचा असेल तर आपण इस्लाम ला उत्तेजन द्यायला हवं हे अमेरिकेच्या कागदोपत्री मांडलेलं तत्वज्ञान आहे. सौदी अरेबियाचा सुन्नी प्रभाव रोखण्यासाठी शिया पंथीयांना आपण मदत करायला हवी, ही अमेरिकेची धारणा होती, दहशतवाद हे आंतरराष्ट्रीय व्यापार युद्धाचं बायप्रोडक्ट असतं, त्यातूनच त्यानंतर तालिबान जन्माला आला. आणि त्यानंतरचा सगळा गोंधळ आपल्याला न्यूज मधून समजत होताच. हे सगळे धागे एकमेकांशी अर्थकारणाच्या आधारावर जागतिक पातळीवर एकमेकांशी कसे जोडले गेलेले असतात हे वाचणं खूप रोमांचकारी वाटलं. 



या सगळ्या अर्थविषयक विवेचनांनंतर विज्ञान, अर्थकारण आणि संस्कृती यांचा एकमेकांशी संबंध आहे का? याबद्दलचे गिरीश कुबेर यांचेच विचार ऐकले. त्यांनी मांडलेली मते ही अशी. 
सुबत्ता आणि विज्ञानवाद हे एकमेकांशी संबंधित नाहीत. सुबत्ता महत्वाची आहेच. सुबत्ता आहे म्हणून विज्ञानवाद नाही किंवा विज्ञानवाद आहे मग सुबत्ता नाही.. असा परस्पर संबंध लावणं पूर्णतः चुकीचं आहे.

भारतीय मानसिकतेचं नुकसान या दारिद्र्याच्या प्रचंड उदात्तीकरणामुळे झाले आहे... साधी राहणी उच्च विचारसरणी याचं थोतांडी कौतुक भारतात होतं ते बदलायला हवं, ते बदलण्याच्या प्रक्रियेमध्ये विज्ञानवाद नक्की मदत करू शकतो. आणि यातूनच भौतिक प्रगती साधता येऊ शकते. 


पण ती भौतिक प्रगती साधण्याचे महत्व भारतीयांच्या लक्षात आलेले नाहीये. भारतीयांची निम्मी शक्ती मेल्यानंतर स्वर्गात मिळणाऱ्या जागेसाठी आत्ता इथे काय करता येईल यातच खर्च होते...! प्रत्येक गोष्टीला भावनेच्या तराजूत तोलून त्याला धर्म आणि संस्कृतीची मखमली शाल पांघरत ती मिरवणे यातच खर्च होते. विज्ञानाच्या तत्वांवर तपासून पाहणे गरजेचे मानले जात नाही. 
विज्ञानवाद हा भौतिक वादाशीच कायम संबंधित असतो. तो केवळ विज्ञानवाद कधीच नसतो, तो भौतिक जगण्याला श्रीमंती, दिशा देत असतो. त्यामुळे भौतिक जगण्याला, आयुष्याला जर आपण कमी लेखत गेलो तर विज्ञानवाद हा मागेच पडतो. म्हणून विकास करण्यासाठी विज्ञानवादाची कास धरणे महत्वाचे आहे. भारतीय परंपरांचे जे आपण अति उदात्तीकरण करत असतो ते काही अंशी ठीक आहे पण ते विकासाला पुढच्या टप्प्यावर नेण्याच्या प्रयत्नाला अडथळा निर्माण करते आणि तेव्हा मात्र आपण देश म्हणून मागे पडतो. 


आर्थिक सुबत्ता आणि संस्कृती यातला संबंध :
संस्कृती टिकते ती आर्थिक सुबत्ता असते तेव्हाच. हे इतिहासापासून सिद्ध होत आलंय. आजवर ज्या काही संस्कृती लयाला गेल्या त्या केवळ त्याचं आर्थिक पाठबळ, सुबत्ता संपल्याने लयाला गेल्या. रोमन साम्राज्याचा विकास तेव्हा झाला जेव्हा पोप हा राजा होता, पाली भाषा किंवा पाली संस्कृती लयाला गेली ती ही भाषा बोलणारे लोक कमी झाले म्हणून नाही तर त्याचं आर्थिक पाठबळ/ताकद संपली म्हणून. हेच आणखी एका सध्याच्या उदाहरणावरून जास्त स्पष्ट होते ते असे कि, अमेरिकन इंग्लिश चा प्रभाव ब्रिटिश इंग्लिश पेक्षा जगात सगळीकडे जास्त आहे ते ती भाषा लोकांना आवडते म्हणून नाही तर अमेरिकन अर्थव्यवस्था प्रचंड ताकदीने मागे उभी आहे म्हणून. 


विज्ञानवाद हा कुठल्याही राज्यसंस्कृतिक (साम्यवाद, हिंदुत्ववाद) वादांना कधीच नको असतो. कारण विज्ञानवाद हा कायम प्रश्न विचारतो. सोळाव्या शतकात होऊन गेलेल्या शिवाजी महाराजांचा इतिहास फक्त मिरवण्यापुरता आपल्याला हवा, त्यांचे किल्ले आपल्याला जपता आले नाहीत, त्यांची मूल्ये आत्मसात करता आली नाहीत... आणि तेच त्यांच्या आधी १६११ साली मरून गेलेल्या शेक्सपिअर ची हस्तलिखितं मात्र इकडच्या पाश्चात्य संस्कृतीने जपून ठेवली, अभ्यासली आणि अजरामर केली. 

आपल्या संस्कृतीमध्ये आपण प्रश्न विचारायला घाबरतो. (घरात मुलांनी विचारलेले प्रश्न, ऑफिस मध्ये कनिष्ठांनी विचारलेले प्रश्न) त्यामुळे प्रश्नांना घाबरणाऱ्या संस्कृतीमध्ये विज्ञानाचा प्रसार कधीही होऊ शकत नाही. दोन शब्दात आपली संस्कृती काय असे सांगायचे झाले तर 'गप्प बसा' हे समर्पक उत्तर आहे. इतका संस्कृतीचा सगळा भोंगळ कारभार आपल्याकडे आहे. नेमकेपणाची विचारांना सवय असली कि विज्ञानाचा प्रसार होतो. याचे एक उत्तम उदाहरण गिरीश कुबेर यांनी झाकीर हुसेन यांची मुलाखत घेतली तेव्हाचं सांगितलं आहे. शास्त्रीय रागांचं प्रमाणीकरण करण्याबाबतच्या प्रयोगावर काम करत असताना झाकीर हुसेन यांचा अनुभव, झाकीर हुसेन भारतीय विद्यार्थ्यांना सहज सांगू शकतात, कि दरबारी कानड्यामध्ये कोमल गंधार लावा, ते लगेच लावतात, गुरूने सांगितलंय त्या पद्धतीने लावतात पण तेच जर अमेरिकन विद्यार्थी कोमल गंधार म्हणजे किती frequency असं विचारतो. त्याचं नेमकं उत्तर द्यावं लागतं. ते येत नाही. कोमल गंधार जर आपल्याला नेमक्या व्याख्येत बसवता येत नाही मग आपण हे ज्ञान पुढच्या टप्प्यावर नेणार कसे. आणि या सगळ्यावर आपण संस्कृती, परंपरा याच्या उदात्तीकरणाची झूल टाकतो.

दैनंदिन प्रश्नांच्या अनुषंगाने आपण आपली मनोभूमिका बदलत नाही, प्रश्न हे जगण्याचा भाग होत नाहीत, भावनेच्या आधारापेक्षा बुद्धीप्रामाण्यवादाने जगण्याची गरज देशाला विकासाच्या नवीन टप्प्यावर नेते. आणि या सगळ्या अनास्थेमुळे सगळ्यात जास्त अर्थांधळे नागरिक हे भारतात आहेत... त्यांच्या धर्म विषयक, संस्कृती विषयक जाणिवा अगदी पोटतिडकीने असतात पण अर्थविषयक जाणिवा अजिबात प्रगल्भ नाहीयेत. त्या जोवर अशक्त आहेत तोवर आर्थिक विकास सशक्त होणं अवघड.

हे सगळं इथे मांडण्या मागे एकच कारण होतं, की आपल्या देशाची, समाजाची अर्थव्यवस्था हा भाग शाळेत असताना इतक्या अनास्थेने केवळ मार्क्स मिळवण्याच्या ओढीने पाठ केला पण आपल्याला तो नीट समजून किंवा समजावून सांगण्यात नाही आला आणि त्यामुळे जी अर्थव्यवस्था रोजच्या आत्ता जगण्याचा भाग आहे ती नीटशी जाणून घेणे कायमच दुर्लक्षिले गेले. म्हणून तिच्याकडे नव्याने नजर टाकावी वाटली. 

टीप:
इथे सांगितलेल्या माहितीबद्दल तुमच्या प्रतिक्रिया वाचायला मला जास्त आवडेल, जेणेकरून मला त्यातून नव्याने काही कळेल. तेव्हा आवर्जून नक्की प्रतिक्रिया कळवा. 


--- अश्विनी वैद्य 
२९.०३. २०  

Saturday 21 March 2020

पत्रवेळा



जी एंची पत्रवेळा उघडलं आज दुपारी असच... कवी ग्रेस यांना ज एंनी लिहिलेली पत्रे यात आहेत. खूप खूप कमी वाचलं आहे मी जीएंनी लिहिलेलं, तेही कोणी असच सुचवलं म्हणून. 
काजळमाया, पिंगळावेळ, सांजशकून यातल्या कथा...पण पुढे आणखी वाचत नाही राहू शकले. त्यांनी लिहिलेलं वाचण्याची ताकद आणि समज इतकी स्वस्त, सहज जिकडे तिकडे कुठे मिळायला. त्यांच्या लेखनाचा गाभितार्थ स्वतःत पचवायला वाचकही एका वेगळ्याच मानसिकतेचा हवा. 'वेगळ्याच' हा खूप बहु अर्थी शब्द आहे खरंतर, आपण भिजवू त्या भावनेत भिजणारा... पण तरीही इथे मला अपेक्षित असलेला त्या वेगळेपणाचा अर्थ त्यांचं लेखन वाचणाऱ्या, पेलणाऱ्या आणि relate करू शकणाऱ्या वाचकांच्या तितक्या संवेदनशील मानसिकतेपर्यंत जाणारा आहे.

त्यांनी लिहिलेल्या पैकी मी ज्या काही कथा वाचल्या त्या समजून घेताना जीएंच्या असामान्य प्रतिभेची मला केवळ ओळखच होवू शकली. ती गोष्ट, त्यातली पात्र, गोष्टीत दिसणारा भोवताल, त्याची तुलनात्मक विषेषणं, आणि ते सगळं गोष्टीत उभारताना त्यांची वाचकाला वास्तविक पण तरीही नेणिवेच्याही पल्याड नेणारी मानसिकता, (असं कसं काय कोणी विचार करू शकतं, हे कसं सुचू शकतं) हे सगळं दैवी प्रतिभेशिवाय कसं शक्य आहे हेच सारखं वाटत राहतं. सगळं अर्थशून्य आहे हे नुसतं म्हणायला माहीत असतं पण त्या सत्यापर्यंत बोट धरून घेवून जाणारं त्यांचं लिखाण आतून खूप अस्वस्थ करत रहातं. आणि एका क्षणी ते खूप असह्य होतं की ते पेलवत नाही... मगाशी चार दोन कथाच वाचू शकले, तेवढ्यावरच थांबले ते म्हटलं ते हे असह्य वाटणं मला पेलू न शकल्यामुळेच अगदी. 

म्हणूनच त्या कथांमधून त्यांच्या प्रतिभेची केवळ ओळखच मला होवू शकली... पूर्ण समजून रिचवता नाही आले त्यांचे लेखन पण निदान एक व्यक्ती म्हणून जीए कसे असतील, एरवी माणसांपासून अलिप्त राहणारे जीए त्यांच्या जिवलग म्हणवणाऱ्या, कधी घरातल्या तर कधी नात्याच्या ना गोत्याच्या पण वैचारिक ओढीने जवळ आलेल्या, बांधल्या गेलेल्या लोकांबरोबरच्या मैत्री सारख्या तरल नात्यात कसे असतील हे त्यांच्या व्यक्तिमत्त्वातलं अंग जाणून घेण्यासाठी मला त्यांनी इतर लेखक कवी मित्रांना लिहिलेली पत्रे वाचावीत असं वाटलं आणि ही पत्रवेळा लगेच घेतली. मागे वाचलेले सुनीता बाईंचे 'प्रिय जीए' ही आठवले. त्यांनी जीएंना लिहिलेली खूप मार्मिक पत्रे त्यात वाचायला मिळाली आणि मैत्रीच्या नात्याबरोबर त्यांच्यातील पत्राद्वारे झालेल्या साहित्यिक गप्पा अनुभवायला मिळाल्या... !

तसाच सुंदर ठेवा या 'जीएंची पत्रवेळा' मध्ये आहे... त्यांनी कवी ग्रेसांना लिहिलेली पत्रे यात आहेत. काही मोठी, काही छोटी, काही असच मन मोकळं करत मित्राला लिहावं वाटलं म्हणून लिहिलेली, काही आधीच्या पत्रांची उत्तरं म्हणून लिहिलेली अशी कवी ग्रेस यांच्यासाठीची ही जीएंची पत्रे... ग्रेसांच्या अनपेक्षित उत्तरामुळे झालेला आनंद ही काही पत्रात जीएंनी अगदी मनापासून व्यक्त केला आहे. ग्रेसांबद्दल त्यांच्या कवितांबद्दल, पत्रांबद्दल जीएंना 'माहेरमाया' वाटे.. हा शब्द मला खूप भावला... आपल्या नकळत आपल्या आतड्यातून कोणासाठी काही दाटून यावं इतकी भरभरून माया या शब्दात भरली आहे असं वाटलं. जीएंना आयुष्यात मित्र म्हणून ही सगळी प्रगल्भ माणसं लाभली हा त्यांच्यामते सगळा सुदैवी योगायोग. आयुष्यभर टिकणारे आणि आयुष्याला सुखावणारे कृतज्ञतेचे संबंध निर्माण होणे हा सुरेख योगायोगच नाहीतर काय.

मोकळेपणी मनातले मांडण्यासाठी या अशा स्नेह्यांशिवाय दुसरा खण तो कुठला असणार, इतक्या अपलेपणी त्यांनी त्यांच्या जिवलग मित्रांना ही सारी पत्रे लिहिली आहेत. या पत्रांमुळे मी खूप घडत गेलो असेही ते म्हणतात. 

ग्रेसांच्या बऱ्याच कविता, त्यांचे शब्द त्यातल्या सुरेल सच्चेपणामुळे जीएंच्या अगदी जिभेवर रेंगाळत राहणारे होते अस ते म्हणतात आणि तरीही एक कविता वाचताना मात्र एक दोन ठिकाणी त्यांना गोंधळल्यासारखे झाले त्याबद्दल ते ग्रेसांना लिहितात, "ती कविता वाचताना मला वाटले, की आपले बोलणे इतरांना समजत नाही, हे ठीक, पण इतरांचे जिवंत, सुगंधी शब्द समजून न येण्याइतका मी एकाकी झालो की काय? Do I understand myself? हे वाचताना मलाच 2 मिनिटे थबकायला झाले. किती सहज नि किती खरेपणी मैत्रीतला संवाद होत असतो. 

ग्रेसांच्या पहिल्या काव्यसंग्रहावर जीएंनी लिहिलेली प्रतिक्रिया त्यांनी एका एका पत्रातून ग्रेसांना कळवली हे ते म्हणतात, "गडद, दाट हिरव्या अंधारात दिसणाऱ्या अस्पष्ट झाडांमधून आत आत हा प्रवास आहे, आणि त्या झाडांना एकेक नाव देता ती स्पष्ट होत जातील..." 

कावळा या ग्रेसांच्या कविते बद्दल त्यांची प्रतिक्रिया मांडताना एका पत्रात जी एंनी भरभरून लिहिलंय, "कावळा हा विलक्षण पक्षी, निःसंशय काळा रंग असूनही त्याच्या बसण्यात किंवा हालचालीत कधी खंत किंवा ओशाळेपणा नाही, मी आहे अशी निर्विकार स्थिर जाणीव आहे आणि भारद्वाजाकडे पाहता, तो मात्र एकदम बिचकतो, बावरतो, आपण फार भडक तर दिसत नाही ना हा बुजरेपणा त्याच्यात आहे." अशा आशयाचे त्या कवितेबद्दल आणखीही खूप काही सविस्तर त्यांनी लिहिले आहे. 

'विशाल उग्र श्र्वापदा प्रमाणे वाटणाऱ्या आयुष्याने मध्येच एक डोळा उघडून आपल्याकडे रोखून पहावे तसा अनुभव देणारी तुमची कविता ' असं ते एका पत्रात ग्रेसांना लिहितात. 

बाकीही असेच खूप संदर्भ आहेत जे वाचताना भारावून जायला होतं. त्यांच्या कथांमधून जीए जितके गूढ वाटतात तोच गूढपणा त्यांच्या पत्रांमधून ही डोकावतो. खूप गोतावळा भोवती नाही पण जिव्हाळ्याची चार माणसे जोडीत, त्यांना भरभरून जीव लावत जगण्याची आसक्ती त्यांच्या पत्रांमध्ये जाणवते. 

वैयक्तिक पातळीवर हा माणूस कसा असेल हे खूपसे स्पष्ट नाही होऊ शकत पण अथांग सागराच्या तळाशी दडलेला त्यांच्या मनाचा तो गूढ भाव तसाच गूढ राहतो. पत्र ही दोन माणसांमधली इतकी जिव्हाळ्याची गोष्ट असूनही त्यांच्या मनाच्या तळाचा या पत्रांमध्येही ठाव लागतोच असे नाही.

कवी किंवा लेखक ज्या कविता, लेख, गोष्टी प्रसिद्ध करतात, तेवढ्यावरच इतरांनी बोलावे, तेवढ्याच खिडक्या उघड्या ठेवण्याचा त्यांचा हक्क आहे. पण त्यांची ही निर्मिती त्यांच्या खाजगी आयुष्यातून, भोगांतून निर्माण झालेली असते, त्यांच्या अनुभवांचे त्यांच्या मनावर उमटलेले रंगीबेरगी डाग, सतत त्रास देणारे आतले कसले तरी वादळ, अस्वस्थता त्यातून कागदावर उतरलेली ती निर्मिती असते हे वाचक जाणतो, त्यामुळं तो लेखक व्यक्ती म्हणून कसा असेल ही थोडीशी तरी उत्सुकता असते... अर्थात मला आहे. त्यामुळंच मी पुलंची लोकप्रिय विनोदी पुस्तके वाचल्यानंतर 'आहे मनोहर तरी' वाचलेले. सुनीता बाईंचे लिखाण समजून घ्यावे म्हणून नाही तर पुलं हे व्यक्ती म्हणून त्यांच्या अर्धांगिनीच्या नजरेत कसे आहेत हे जाणण्यासाठी. तसेच मागे गौरी देशपांडेचेही (मला) खूप practical वाटणारे लिखाण वाचलेले. लेखकाच्या लिखाणावरून त्या निर्मिती मागच्या प्रेरणा काय असतील, इतकं दुःखद लिहिणाऱ्या लेखकाला (हे स्पेसिफिक जीएंबद्दल) त्यांनी भोगलेल्या वेदनेविषयी अपार आसक्ती आणि म्हणूनच आपुलकी असणार, त्या अर्थाने ते जाणून घ्यायची ओढ.

एक मात्र नक्की ही सगळी पत्रे दोन दिग्गज प्रतिभावंतांमधला सुरेख मैत्रीचा धागा उलगडतात आणि वाचनाचा सुखद आनंद देतात.


खूप random, वाटेल तसं अस्ताव्यस्त लिहिलेलं आहे. मन असे मोकाट फिरेल तिकडे उधळून दिले आहे... !


                                           --- अश्विनी वैद्य
                                                २०.०३.२०










राजस्थान डायरी : उदयपूर

उदयपूर - कॅपिटल ऑफ मेवाड - City of lakes, झिलों का शहर असलेल्या राजस्थान मधील या सुंदर ऐतिहासिक शहराला भेट देणं म्हणजे कला, राजस्थानी स्थाप...