खूप भयाण शांतता सगळीकडे, सगळं अपरिचित, अनोळखी....
मी अगदी एकटी चालली आहे..... बरीच लांब कुठेतरी...
अंधुक, धूसर वाट, वाटेला अनोळखी वास....
परिचितता कणाकणांत शोधण्याचा माझा हव्यास...
पण नाही... एकटेपणाच्या दुबळ्या वाटा खोल दरीत जाणाऱ्या...
माझं असं कोणीच नाही जवळ.... चाचपडत पाय पडतो कुठेतरी...
आणि एकदम अचानक एक खूप मोठ्ठा आवाज येतो....
जीवाचा थरकाप उडवणाऱ्या असुरक्षिततेच्या भीतीचा तो उच्चांक असतो.
मी प्रचंड घाबरते आणि डोळे गच्च मिटून घेते...
पुढे काय नि कसं...
या पेक्षा...
त्या क्षणाला मला माझे म्हणवणारे असे सगळे चेहरे माझ्या भोवती दिसतात
बंद डोळ्यांच्या पडद्याआडचे ते आपुलकीचे स्पर्श जाणवतात
मला त्या शेवटच्या क्षणी आधार म्हणून नाही,
तर आजवर मला नकळत दिलेल्या अपरिमित सुखाच्या क्षणांची सोबत म्हणून
सारं काही, सोडून जातानाच्या, अतीव समाधानाच्या क्षणांची नांदी म्हणून
काहीच उरलं नाहीये, पण केवळ एक ऊर्जा... सकारात्मक.... मला त्या अनंतात सुद्धा त्यांच्याशी जोडणारी,
कोण होती ती माणसं... माझ्या रक्ताची, नात्याची...?
कदाचित प्रेमाची... अतिशय पवित्र अशा निस्सीम प्रेमाची,
खऱ्या नि शुद्ध विचारांची...आणि त्यामुळंच अगदीच थोडीशी...!
वाटेवर नकळत भेटलेली, आपोआप जोडली गेलेली...!
माझी...!
---अश्विनी वैद्य
२०. १२ . १६
टीप : प्रेम नक्की काय असतं, याचा स्वतःशीच घोळ घालत जे सापडतंय असं वाटलं ते लिहिण्याचा प्रयत्न केलाय...!
कदाचित पटेल, कदाचित नाही....!