Monday 24 July 2017

हार


"अगं चल ठेवते मी फोन...बोलू परत " असं म्हणून मेघानं तिच्या ऑफिसमधल्या मैत्रिणीचा फोन ठेवला. "अगं आई, त्यांनी टॉस जिंकलाय, अँड decided to बॅट, ये लवकर, सुरु झाली मॅच "
"अरे देवा, हो का... त्यांनी जिंकला टॉस, पण ठीक आहे, खेळतील आपल्या पोरी चांगल्या... आलेच मी, स्वयंपाक उरकलाय लवकरच, राहिलेली आवराआवर करते आणि आलेच ५ मिनिटात. "

" झाली का गं मॅच सुरु, मी पण अगदी प्रत्येक बॉल बघणार आहे बाई..." मेघाची आजी आतल्या खोलीतून बाहेर येत म्हणाली. तिला असं लगबगीनं बाहेर येताना पाहून स्वतः सोफ्यावर निवांतपणे टेकत बंडोपंत बोललेच, "आजी तुला काय कळतं गं क्रिकेट मधलं..."
"असू दे रे, पोरी खेळताहेत ना आपल्या... ते बघायचंय मला पण, आणि नाही कळलं तरी तू आहेस कि सांगायला, पोरांचा वर्ल्ड कप बघायला बसलेलात ना घरी दहा जण गोळा करून गोंधळ घालत आणि आपण वाईट्ट हरल्यावर असे लांबट चेहरे करून त्याच खेळाडूंना शिव्या दिल्यात, ज्यांना डोक्यावर घेऊन नाचलात. आज आपल्या पोरी हारो नाहीतर जिंको, इथवर आल्यात ना... म्हणून त्यांचा खेळ बघणार आहे मी आज. "
"गप रे बंड्या, तुला काय त्रास आहे, आजी तू मॅच बघ गं निवांत, मी सांगते तुला आऊट झालं की, फोर-सिक्स मारला की... फुल्ल धम्माल करू आपण लेडीज स्पेशल "
यावर कुत्सितपणे हसत दोन ओव्हरमधल्या ब्रेक मध्ये लागणाऱ्या ऍड बघत बंडोपंत उदगारले "अगदी परवा पर्यंत इंडिया टीमची कॅप्टन कोण हे पण माहीत नव्हतं कि गं तुला मेघा आणि आता फायनलला गेली टीम कि पार लगेच उर अगदी भरून आला तुझा...."
" हो नव्हती माहीत मला कॅप्टन बद्दलची डिटेल इन्फो, पण महिला क्रिकेटचा कॉमन पीपल मधला अवेअरनेस न वाढायची कारणं यावर बरीच वादावादी करून झालीय आपली याआधी, सो तू काही बोलूच नकोस.... परवा घरी आलेल्या तुझ्या मित्राला विचारलं, काय रे वूमेन्स वर्ल्ड कप करतोयस का फॉलो... तर चक्क हसायला लागला जोरजोरात... वर म्हणतोय कसा, काहीही काय, वेडी आहेस का, मी नाही बघत वूमेन्स क्रिकेट, किती स्लो खेळतात त्या. आम्ही इथे ग्राऊंडवर सुद्धा खूपच बरं खेळतो त्यांच्यापेक्षा... आणि यावर अजून गम्मत म्हणजे, त्यानं परवाच्या सेमीफायनल नंतर भारताच्या महिला क्रिकेट संघाचं कौतुक करणारी फेसबुक पोस्ट टाकली. कसले मित्र आहेत रे तुझे.... हाहाहा "
"ए गप गं, बघ मॅच, फिल्डिंग नीट नाहीये आपली. गेला बघ फोर" बंड्या
" किती लहान दिसतीये गं ती चेहऱ्यावरून... कोण आहे ती " इति आजी
"आई, अहो दीप्ती शर्मा आहे ती... एकोणीस वर्षांची फक्त " आई
"अगंबाई हो का... किती लहान पोरी खेळताहेत. अगदी आपल्या सारख्यांच्या घरातून गेल्या असतील या पोरी, नाई.... कधी कुठल्या जाहिरातीत या आधी दिसल्या नाहीत गं, त्या कोहली वैगेरे सारखं"
"तशाही आता मात्र पोचतील या पोरी आपल्या सारख्यांच्या घरा-घरात, ते सचिन, कोहली आपल्याच घरातले लोक असल्यासारखे वाटतात ना सगळ्यांना तसंच." आजी
"येस काढली बघ विकेट त्यांची... धाताड ताताड...टपार टपार... " मेघा
"बसा शांत, अजून वे to गो...!" बंड्या
"अरे वाह, छान... खेळा गं बाई पोरींनो अशाच नीट... अगं ती बघ, अगदी तोंडावर हात ठेवून कशी गोड हसतीये... इंग्लंडच्या पोरी आपल्या पोरींपेक्षा पारच धष्टपुष्ट आहेत बाई, नाई का गं मेघा" आज्जी
"आजी मॅच बघण्यापेक्षा तुझी बडबडच जास्त चालूये... बघूया ना शांतपणे..." बंड्या
" आई, ही बघा... ही आपली कॅप्टन, मिथाली राज, ती पूनम राऊत... हो ती छोटे केस आहेत ना तीच पूनम राऊत, मुंबईची आहे ती" मेघा आणि बंड्याची आई
"खरंच छान वाटतंय गं, यांच्या घरच्यांनी त्यांना क्रिकेट खेळू दिलं नसतं, पोरांचे खेळ कसले खेळता म्हणून हटकलं असतं, पुढं प्रोत्साहन दिलं नसतं, तर कशा आल्या असत्या ना इथवर.... घर, लग्न, संसार, घराला हातभार म्हणून फार तर एखादी नोकरी, आणि मग म्हातारपण, संपलं आयुष्य, सगळ्यांसारखं सरधोपट... हे क्रिकेट खेळणं कुठच्या कुठं उडून गेलं असतं या पोरीचं... म्हणून कौतुक वाटतं गं त्यांचं." आजी
"येय, अजून एक विकेट घेतली आपण आजी...पाहिलंस का तू ? ते बघ रिप्ले मध्ये दिसेल आता. पटापट विकेट घ्यायला हव्या, स्कोरचा डोंगर नको रचू द्यायला... मग आपण जिंकू आरामात... आई मस्त चहा टाक ना सगळ्यांसाठी" मेघा
" आज बंड्या चहा करणार आहे आपल्यासाठी.... मी काही आता इथून लंच ब्रेक शिवाय उठायची नाही. " आई
"फिमेल डॉमिनेटेड घर झालंय आपलं, आज बाबांना पण नेमकं वर्किंग आलंय... ताई, माई आजी टाकतो मी चहा, तुम्ही निवांत मॅच बघा हं... " बंड्या थोडा चिडचिडतच उठला
"दोनशेच्या वर नकोय स्कोर जायला रे, आऊट करा गं पोरींनो पटापट त्या इंग्रज पोरींना, आलं टाक रे चहात" आई
"बंड्या गेलाय तशा पटापट विकेट निघत आहेत ना त्यांच्या, हो ना गं आई. ए बंड्या, तू इकडे येऊच नकोस रे, तिथेच बस, तसही फोन आहे तुझ्याजवळ, व्हाट्सअप वरून अपडेट्स कळतीलच तुला, तू नको येवूस इकडे, तसंही टुकार कमेंट देत बसतो काहीतरी. " मेघा
"हा काय गं वेडेपणा, मिटक्या मारत चहा पिशील की आता, झाला कि आण रे बाळा आणि ये बघायला तू ही" आजी
"अगं आजी, तुला माहितीये का, इंडिया-पाकिस्तान फायनल होती ना ती आठवतीये का, चॅम्पयन्स वर्ल्ड कप पुरुषांचा, त्यासाठी बंड्याचा एक मित्र असतो ना तिकडे इंग्लंडला तो १३०० पौंडचं तिकीट काढून गेला होता ती मॅच बघायला, किती सट्टेबाजी, कितीतरी कोटींची उलाढाल, आणि शेवटी काय तर त्यात नामुष्कीचं हरलो, त्याच दिवशी इंडिया पाकिस्तान वूमेन्स मॅच मात्र आपण जिंकलो होतो पण ते तर कोणाच्या गावी पण नव्हतं...अशी आपली लोकं आहेत बघ. " मेघा
"हं, आठवतंय ना... पण बदलेल आता परिस्थिती, मुलींनी दिलय दाखवून, आम्हाला कमी नका समजू.... आम्ही मुलांपेक्षा कमी नाहीयोत. हे घे रे बंड्या कप, ठेव ओट्यावर, छान झाला होता चहा." आजी
" मुली मुलांपेक्षा कमी कुठल्या, चार पावलं पुढच... २२९ करायचेत ना आपल्याला, आरामात करू ,खेळणार पोरी छान . "

या विश्वासानं आपली इनिंग बघायला साखरेला मुंग्या चिकटव्यात तसे सगळे परत टीव्हीला चिकटले... आई, आजी, मेघा, अगदी ओरडून ओरडून बाऊंड्रीज वैगेरे सेलेब्रेट करत होत्या. पूनमचे ८६ वर आऊट होणे पूनम प्रमाणेच आईलाही लवकर झेपले नाही. त्यानंरच्या प्रत्येक बॉलला धडकी भरत आजीही खुर्चीतून उठत होती. बंड्याला तर अनलकी ठरवून घराबाहेर कधीच काढला होता. कृष्णमूर्तीचा एखादा फोर आजीच्या चष्म्यातून हसरी लकेर सांडत होता. पॉवरप्ले चालू झाला तशा तिघी एकमेकींना सांगत होत्या, आरामात जिंकू आपण, जेवढे बॉल तेवढेच तर रन करायचेत नक्की होतील, फक्त विकेट टिकवल्या म्हणजे झालं. हे तेच तेच परत परत एकमेकींना सांगत बजावत होत्या. आजी तर 'आत्ता माझ्या हातात बॅट असती तर मीच सिक्स मारला असता' या अविर्भात हातवारे करून बोलत होती. पण शेवटी, ज्याची भीती वाटत होती तेच झालं, मनोबळ टिकवायला आपल्या पोरी शेवटच्या घडीला थोड्या कमी पडल्या आणि हातातोंडाशी आलेला वर्ल्डकप हातातून निसटला. मेघा आणि आई एकदम मटकन खुर्चीत बसल्या. आजी अजून तशीच उभी होती. मॅच सुरु झाल्यापासूनचा तिचा आवेश, तिचा उत्साह, हे तिच्या वयाचा तिला विसर पाडत होतं. मुलींना असं इंग्लंडच्या लॉर्डस वर खेळताना बघून झालेला आनंद, अभिमान असं सगळं दाटून आलं होतं. मेघा अगदी कळवळल्या स्वरात म्हणाली, "आजी हरलो गं आपण"

यावर आजी जे बोलली ते ऐकून दारातून येणारे बाबा आणि बंड्या दोघेही तिथेच थांबले, आवाक होऊन आजीचं हे वेगळं रूप डोळ्यात साठवत.

"पोरींनो, तुम्ही मानाने हरलात... वर्ल्ड कप मिळाला नाही देशाला...पण ज्या जिद्दीने तुम्ही इंग्लंड सारख्या बलाढ्य देशाला त्यांच्याच देशात ऐतिहासिक वारसा असलेल्या लॉर्डस वर हारवण्याचे स्वप्न आम्हा सर्व भारतीय महिला मुली बायकांना दाखवलत यासाठी तुम्ही आमच्यापुरत्या तर जिंकला आहात. इंग्लंडला तोंड द्यायचं आव्हान तुम्ही कमकुवत रित्या नाही पेललं.  ज्या मुलींना इतर देशातल्या त्या त्या खेळात प्रावीण्य असलेल्या मुलींसारखा पाठिंबा घरातूनच मिळणं अवघड असतं अशा पार्श्वभूमी मधून तुम्ही आलेल्या....वर्ल्डकप फायनल पर्यंत पोचलात हेही काही कमी नव्हतं. क्रिकेट हा मुलींनी खेळायचा खेळ असतो याला भारतासारख्या देशात भूतकाळ आणि भविष्य या दोन्हींची शाश्वती नव्हती, त्याला तुम्ही भविष्य दिलंत आणि त्यातून इंग्लंड सारख्या प्रगत देशातल्या टीमला तितक्याच ताकदीनं तोंड दिलत याचं खरंच कौतुक आहे." आजी टीव्हीकडे बघत तिच्याही नकळत हे सगळं बोलून गेली.



--- अश्विनी वैद्य 
२४.०७. १७  

Wednesday 19 July 2017

वनवास - शारदा संगीत - पंखा



कोणतीही गोष्ट पहिली, वाचली, जाणवली कि त्यावर विचार करून मनात उमटलेली प्रतिक्रिया इतरांसमोर मांडणे ही एक नैसर्गिक गरज असावी, मग ती समोरच्याला रुचणारी असो अथवा नसो पण तरी ती इतरांबरोबर share करणं मला तरी आवडतं. त्यावरची इतरांची मतंही माहिती होतात, विचारांच्या नवीन वाटा मिळतात म्हणून खरंतर हे सगळं असं लिहिण्याचा हा खटाटोप. पुस्तक परिचय लिहिण्याचा माझा हा पहिलाच अनुभव... !

पुस्तक परिचय : वनवास

फुलपाखरू जसं इकडून तिकडं सतत भिरभिरतं, वेगवेगळ्या फुलांपाशी उडत राहतं, तसं मनात चालू असलेल्या वेगवेगळ्या विचारांभोवती एका पौगंडावस्थेतील मुलाच्या कोवळ्या, नाजूक मनाचं भिरभिरणं प्रकाश नारायण संत यांनी तितक्याच ओघवत्या, सहज पद्धतीनं मांडलेलं वाचणं अतिशय आनंददायी वाटलं. काही गोष्टींशी त्या वयात जडलेलं किंवा आपणच असंच जोडलेलं एक आपलं आपलंच नातं, मग ते काही असो, झाडाचा पार, घराचं फाटक, खोलीची खिडकी, अंथरूण, वह्या पुस्तकं काहीही... त्या वयात अशा साऱ्या बद्दल वाटणारा अव्यक्त जिव्हाळा शब्दात बांधण्याचं लेखकाचं कसब याला तोड नाही. वाचताना सारे प्रसंग, चित्र अगदी डोळ्यांसमोर दिसायला लागतात.


बालपणीचा निरागस, अल्लड वेडेपणा आणि तारुण्याच्या उबंरठ्यावर येऊ घातलेला कोवळा समंजस बाणेदारपणा या दोन्हीच्या मध्ये असणारी ही चंचल, मधाळ अवस्था वेगवेगळ्या प्रसंगातून शब्दात उतरवत वाचणाऱ्याला मोहून टाकते. अगदी साध्या, थोड्याशा अबोल, शांत अशा किशोरवयीन मुलाच्या मनाची त्याचे आई-वडील, आजी-आजोबा, मित्र-मैत्रिणी यांच्या सहवासात वावरताना होत असलेली कधी आनंदी, तर कधी दुखी तर कधी स्वतःलाच पार अबोध अशी अवस्था तितकीच ओघवती मांडली आहे. त्याच्या अबोल, बंद अशा ओठांमागं दडलेलं त्या संवेदनशील वयातलं त्याचं गोड़ भावविश्व् उलगडत जाताना वाचणारा प्रत्येक जण त्यात कुठेतरी स्वतःला नक्की दिसायला लागेल इतकी सहजता त्यांच्या लिखाणात आहे. क्षणात हसरं कि लगेच साध्याशा गोष्टीनं खट्टू होणारं निरागस मन, ज्याला तात्विक प्रौढत्वाचं मिसुरडं अजून फ़ुटायचंय आणि म्हणूनच ते खूप लाघवी आहे अशा सुंदर विश्वाची कधी काळी आपणही अनुभवलेली सफर लंपनच्या भावविश्वात शोधण्याचा कयास म्हणजे वाचनीय वनवास.


पुस्तक परिचय : शारदा संगीत 

लंपनच्या किशोरवयीन भावविश्वाशी जोडलेल्या प्रसंगांना एका वेगळ्या शैलीत बांधत प्रकाश नारायण संत यांनी लिहिलेल्या पाच दीर्घ कथा वनवास नंतरच्या 'शारदा संगीत' या त्यांच्या पुढच्या कथासंग्रहात आहेत.
वनवास मध्ये लंपनच्या व्यक्तिरेखेत वाचक स्वतःच्या भूतकाळात हरवून स्वतःलाच त्यात कुठेतरी सापडत जातो. त्यातून मग तयार होत गेलेली लंपन बद्दलची प्रतिमा या पुढच्या 'शारदा संगीत' मध्ये वेगवेगळी वळणं घेत प्रत्येक कथेत हळू हळू विस्तारत जाते, प्रगल्भ होत जाते आणि वाचताना आपल्याला एकवीस वेळा मॅड करून सोडते...!

कोणताही प्रसंग पाहिल्यावर, अनुभवल्यावर त्यावर लगेच कोणासमोर व्यक्त होण्याआधी मधल्या काही सेकंदात आपल्या मनात आपण स्वतःशी जो अशाब्दिक संवाद करत असतो, तो शब्दांत, चपखल रूपकात बांधलेला वाचताना आपल्या खूप जवळचा वाटायला लागतो. ओघावत्या शैलीत मांडलेल्या त्या संवेदना वाचकाला मोहून टाकतात. त्यामुळंच पुस्तकात लंपनचा एकोणीसशे वेळा येणारा 'मॅड' हा शब्द या आधी कधीच इतका गोड वाटला नव्हता.


वाचनाबाबत तितकी जाण मला लंपनच्या वयाची असताना नव्हती. खरंतर त्या वयात ही पुस्तकं हाती पडायला हवी होती म्हणजे त्यावेळी कोऱ्या मनात तयार होऊ घातलेल्या कल्पनांची रोपं ती मॅड समजून मुळं धरण्याआधी स्वतःच उपटून टाकली नसती.

'वनवास' नंतरचा हा पुढचा अनेक पुरस्कार मिळालेला पाच दीर्घ कथांचा प्रकाश नारायण संत यांचा 'शारदा संगीत' कथासंग्रह, हा लंपनच्या त्याच्या आई-वडील, आजी-आजोबा, बहीण-भाऊ या कुटुंबाव्यतिरिक्त घराबाहेरील जगात कोऱ्या मनाने वावरताना, त्यात उमटत जाणारे भाव, नाजूक संवेदना आणि याची त्याला होत जाणारी हळुवार जाणीव हे सारंच वाचकाला मोहून टाकतं आणि तिथल्या भाषेची सुंदर ढब चाखत, स्वतःच्या भावविश्वात रमण्याचे काही सुखद क्षण नक्कीच देतं.

आभाळ भरून आल्यावर कसं कधी कधी खूप सुंदर वाटतं, मन आनंदानं हलकं, रितं झाल्यासारखं वाटतं, तसं काहीसं हे पुस्तक वाचून संपल्यावर वाटलं. रमण्याचा आनंद तर मिळालाच पण भिजण्याचं सुखंही अजून हवंय ही जाणीवही उत्कट वाटली. कदाचित लेखकाची हीच शैली 'पंखा' हा त्यांचा यानंतरचा पुढचा कथासंग्रह हाती घ्यायला भाग पाडतीये...!

पुस्तक परिचय : पंखा

बरीच वादावादी घालून लेक finally शांत झोपली होती. नेहमीपेक्षा जरा उशिराच. आईला आपल्या बाळाचं असं झोपलं असतानाचं निरागस रूप खूप जास्त भावतं. ती जागी असताना आपल्याशी वाद घालतानाचा तिचा तो आवेश, तिचंच कसं बरोबर आहे हे सांगण्याची तिची धडपड, तिचं म्हणणं आपल्याला पटवून देण्याची तिची उतावीळता, मग आपलं तिच्यावर जरा चिडूनच ओरडणं, या सगळ्यात तिचे बदलणारे चेहऱ्यावरचे भाव, घड्याळाच्या काट्याशी तिचं न जुळणारं गणित सोडवण्याचा आपला आटापिटा, त्यावरून नेहमीच होणारी चिडचिड, गोंधळ हे आणि असे बरेच त्राग्याचे, घाईचे, उलघालीचे, काळजीचे, घाबरण्याचे असे दिवसभरात येणारे वेगवेगळे प्रसंग हे असं तिचं झोपलेलं निरागस रूप बघताना आठवतात आणि मग अगदी कासावीस व्हायला होतं.

नऊ वर्षाची नाजूक, कोवळं मन असलेली माझी लेक, मनात हजार गोष्टीबद्दलचे प्रश्न, शंका, कुतूहल बाळगत मोघम अनुभवावर तयार करत असलेली तिची अगदी ठाम मतं, नावीन्याचं भलतं आकर्षण, वाचनावर आधारित तिच्या मनात नाचणाऱ्या कल्पना आणि त्याचा रोजच्या जगण्याशी जोडलेला भन्नाट ताळमेळ, या अशा चहू बाजूनी सळसळत असणाऱ्या तिच्या सगळ्या जाणिवा, संवेदना या अशा शांत वेळी तिच्या झोपलेल्या निरागस चेहऱ्याकडे बघून जास्त बोलक्या वाटतात. सध्या वाचत असलेलं प्रकाश नारायण संत यांच्या 'पंखा' या पुस्तकात लंपनच्या भावविश्वात हरवताना मला माझ्या लेकीच्या भावविश्वाची पुन्हा नव्यानं जाणीव होत गेली हे नक्की. तिच्याशी निगडित गोष्टींकडे माझ्यापेक्षा तिच्या दृष्टिकोनातून बघण्याचं तंत्र मी गेले काही दिवस विसरले होते, याचं भान मला हे पुस्तक वाचताना झालं.

आधीच्या वनवास आणि शारदा संगीत या नंतर क्रमशः येणारी ही पुढची कादंबरी 'पंखा'. अकरा छोट्या कथांमध्ये गुंफलेलं लेखकाच्या वेगळ्याच शैलीत मांडलेलं लंपनचं कोवळं भावविश्व् आधीच्या दोनही पुस्तकांप्रमाणेच वाचणाऱ्याला बांधून ठेवतं. साधेपणा भावणं हा तो किती सहज आणि सुंदर पद्धतीने समोर येतो त्यावर अवलंबून, पुस्तक वाचताना हे सारखं जाणवत राहतं. शांत, समंजस पण येत जाणाऱ्या अनुभवातून जे काही वाटतं त्याबद्दल मात्र अनभिज्ञ असणारा लंपनचा कोवळा साधेपणा वाचताना खूप भावतॊ. पुस्तकातल्या गोष्टींबद्दल इथे लिहून त्यातलं औत्सुक्य घालवणं मला पटत नसल्यानं मी ते इथे टाळलेलं आहे. केवळ इतकच म्हणता येईल कि, आधीच्या पुस्तकांप्रमाणेच याही पुस्तकात, मनाची संवेदना, त्यावर आधारित स्वभाव वैशिष्टये आणि त्याकडे बघण्याचे दृष्टिकोन ओघवत्या शैलीत मांडत लेखकानं लंपन बरोबरच इतरही व्यक्तिचित्रे खूप सुरेख पद्धतीने उभी केली आहेत. त्यामुळं त्यातल्या गोष्टी वाचणाऱ्याला त्याच्या भूतकाळात रमायला मदत करतात आणि वाचन आनंददायी करतात हे नक्की.


यानंतरचे झुंबर हे चौथे पुस्तक सध्या लगेच वाचणं शक्य होईल असे वाटत नाही. त्यामुळं त्या बद्दल लिहिलेले नाही.

---- अश्विनी वैद्य
१९.७.१७

राजस्थान डायरी : उदयपूर

उदयपूर - कॅपिटल ऑफ मेवाड - City of lakes, झिलों का शहर असलेल्या राजस्थान मधील या सुंदर ऐतिहासिक शहराला भेट देणं म्हणजे कला, राजस्थानी स्थाप...