Friday 14 February 2020

'Sapiens - A Brief History of Humankind'


Image result for sapiens


    कथानकं असलेली पुस्तकं भाषेच्या, शब्दांच्या ओढीनं वाचायला मला नेहमी आवडतात. पण माहितीपूर्ण पुस्तकं त्यामुळं माझ्यासाठी थोडी बाजूला पडतात. पण यावेळी एका मैत्रिणीने सुचवलेल्या एका पुस्तकाने मात्र अगदी वेड लावले आहे. ते म्हणजे, युव्हाल नोअा हरारी या इज्राईली इतिहासकाराने लिहिलेले ' Sapiens - A Brief History of Humankind ' (न्यूयॉर्क टाइम्स बेस्ट सेलर) हे पुस्तक. हे पुस्तक एक milestone ठरेल इतके भन्नाट आहे.

लेखकाबद्दल चार शब्द : युव्हाल नोआ हरारी (वय 43) हा हिब्रू युनिव्हरसिटी ऑफ जेरुसलेम मध्ये इतिहास विभागात professor म्हणून काम करतो. Original पुस्तक हिब्रू मध्ये आहे. 2014 ला ते इंग्लिश मध्ये प्रकाशित झाले. त्याने लिहिलेले हे पुस्तक बराक ओबामा यांनीही वाचण्यासाठी recommend केले आहे.

    हे पुस्तक आपल्याल्या, वाचताना पहिल्या पानाच्या पहिल्या ओळीपासून हजारो वर्ष जुन्या मानवजातीच्या काळात इतक्या सहजपणे रमवते की मला पुस्तक खाली ठेवूच वाटले नाही. असे असूनही वाक्यावाक्यात मिळत जाणारी माहिती इतकी प्रचंड आहे की ती पचवायला, आत उतरवायला वेळ लागतो. त्यामुळं कितीही वाटले तरी एका वेळी तीस पानांच्या वर मी वाचूच शकले नाही.
एक एक वाक्य हे मोठमोठ्या पुरातन कालखंडाचं सार आहे, असं वाटतं.... कुठेही एवढा सुद्धा फापट पसारा नाही, एखादा भाग गाळून पुढे वाचावं असं नाही... हे वाचताना आपली स्वतःची विचारक्रिया ही background ला चालू होते.

    उत्खनन करताना अवशेष रुपात सापडलेल्या हाडांचे सापळे, छोटे तुकडे त्याचा अभ्यास करून, त्यातल्या जनुकीय विश्लेषणावरून त्या जातीच्या अस्तित्वाचा काळ, शारीरिक रचना, त्या जातीच्या सवयी, त्यांची स्वभाव वैशिष्ट्ये, त्या वेळची संस्कृती, आणि या सगळ्याचा आताच्या वर्तमानातल्या सेपियनस् च्या जीवनपद्धतीशी लावलेला संबंध हे सारं वाचताना केवळ भारून जायला मला झालं. त्याने मांडलेल्या संकल्पना इतर अभ्यासकांना पटणाऱ्या आहेतच असं नाही पण आपल्या सारख्या सामान्य लोकांना माणूसपणाच्या पडलेल्या अनेक प्रश्नांच्या उकली या पुस्तकात नक्कीच सापडतील. इतक्या स्पष्ट आणि मुद्देसूदपणे लेखकाने मांडलेल्या निरीक्षणावरून ते लक्षात येत जाते आणि बरेच ' का?' उलगडायला मदत होते.

    अशा पुस्तकातले मला आवडलेले काही मुद्दे मला नोट्स रुपात लिहून ठेवायला नेहमी आवडते, माझ्या weak memory ला भविष्यात लागलाच तर थोडासा आधार मिळेल म्हणून मी कदाचित लिहून ठेवत असेन तर ते काही मुद्दे इथे नमूद करते.



   साडेतेरा अब्ज वर्षांपूर्वी बिग बँग मध्ये आकाश, ऊर्जा, काळ ही मूलभूत तत्त्व जन्माला आली. सत्तर हजार वर्षांपूर्वी होमोसेपियन्स या सजीवांच्या जातीने संस्कृती नामक रचनांची निर्मिती केली. मानवाच्या या इतिहासाला 3 महत्त्वाच्या क्रांती कारणीभूत ठरल्या. १. Cognitive revolution ( सत्तर हजार वर्षांपूर्वी), 
२. Agriculture revolution ( बारा हजार वर्षांपूर्वी) and 
३. Scientific Revolution( पाचशे वर्षांपूर्वी).
या तीनही क्रंतीमुळे मानवावर आणि त्याच्या भोवतालवर काय आणि कसा परिणाम होत गेला याची माहिती या पुस्तकात आहे. तीन भागात पुस्तकातली माहिती विभागली आहे. 

१. कॉग्निटिव्ह रेव्होल्यूशन : 
पंचवीस लाख वर्षांपूर्वी पूर्व आफ्रिकेत अस्त्रेलोपिथिकस या प्रजातीच्या महावनारापासून मानव प्रथम उत्क्रांत झाला. त्यांच्यापैकी काही पुरुष आणि स्त्रिया 20 लाख वर्षांपूर्वी उत्तर आफ्रिका, युरो आणि आशिया भागात स्थायिक होण्यासाठी गेले, उत्क्रांत होत गेले, आणि परिणामी त्यांच्या वेगवेगळ्या जाती निर्माण झाल्या. युरोप आणि आशिया मधल्यांना शास्त्रज्ञांनी नियांडरथल हे नाव दिले. आणि अतीपूर्व आशियात होमोइरेक्ट्स (ताठ कण्याचा माणूस) जवळपास वीस लाख वर्ष जम बसवून होता... वीस लाख वर्ष हा खूप मोठा काळ आहे. आत्ता पासून पुढे हजार वर्ष सुद्धा आत्ताचे आपण होमो सेपियन्स टिकून राहू की नाही हे सांगता येत नाही.

इतर प्राण्यांच्या तुलनेत मानवाच्या मेंदूचा असलेला मोठा आकार ही एक लक्षणीय बाब होती. पण मोठ्या आकराच्या मेंदूमुळे शरीरातली अधिक ऊर्जा खर्च होते. माणूस जेव्हा झोपतो तेव्हा 25% ऊर्जा मेंदूसाठी खर्च होते, तेच चिंपाझी आणि गोरीला यांची केवळ 8 टक्के खर्च होते.

मोठ्या मेंदूची मानवाला 2 प्रकारे किंमत मोजावी लागली. एक म्हणजे अन्नाच्या शोधात खूप वेळ घालवावा लागला आणि दुसरं म्हणजे स्नायूंचा शोष झाला. हे असलं तरी आपल्याला मोठ्या मेंदू मुळे बरच काही दिलं आहे.
स्वरक्षणार्थ हत्यारं तयार करणे, त्यांचा वापर करणे, नवीन शिकण्याची विलक्षण क्षमता वैगेरे.

वीस लाख वर्षांपूर्वी चा माणूस अन्नसाखळी च्या पिरॅमिड मध्ये मध्यभगी होता (आपल्या पेक्षा छोट्या प्राण्यांची तो शिकार करायचा आणि मोठ्या प्राण्यांचा तो शिकार व्हायचा). पण चार लाख वर्षांपूर्वी चा माणूस अन्नसाखळीत एकदम सर्वोच्च स्थानी इतक्या झपाट्याने गेला की त्याने परिस्थितीला जुळवून घ्यायला इतरांना आणि स्वतः लाही अवधीच दिला नाही. त्यामुळं सेपियनस् हा अविकसित राष्ट्रातल्या हुकुमशहा सारखा दुबळा प्राणी ठरला. सतत आजूबाजूच्या वातावरण घाबरणारा.


अनीचा शोध हा मानवाच्या वाटचालीतला महत्वाचा टप्पा : ज्या फळं, भाज्या नैसर्गिक स्वरूपात पचवता येत नव्हत्या ते सोपं झालं, अन्न खायला लगणारा वेळ कमी झाला, त्यामुळे दातांचा आकार आणि आतडही छोटं झालं.
आतड्याची लांबी कमी होण्याचा आणि मेंदूच्या वाढीचा प्रत्यक्ष संबंधही काही शास्त्रज्ञांनी लावला आहे.
आगीवर नियंत्रण म्हणजे ज्योत कुठे आणि केव्हा पेटवायची याची निवड त्याला करता यायला लागली. याचा उपयोग त्याला कितीतरी कामांसाठी व्ह्यायला लागला, जसं की सिंहाला घाबरवणे, रात्रीच्या थंडीत ऊब निर्माण करणे,

आफ्रिकेच्या एका कोपऱ्यात आपली म्हणजे होमोसेपियन्स ची जात अस्तित्वात होती, दीड लाख वर्षांपूर्वी आपल्या सारख्या दिसणाऱ्या होमो सेपियनस् ची वस्ती होती या मताशी बरेच वैज्ञानिक सहमत आहेत. सेपियन्स ज्या ज्या नवीन ठिकाणी गेले तिथल्या स्थानिक मानव जातीला त्यांनी संपुष्टात आणले. होमो सोलोंसिस हे पन्नास हजार वर्षांपूर्वी पर्यंत होते, नियांडरथलच अस्तित्व 30 हजार वर्षांपूर्वी संपुष्टात आलं तर 12 हजार बारा हजार वर्षांपूर्वी फ्लोरेस मधल्या ठेंगु माणसाचं अस्तित्व संपलं. त्यांच्या मागे होमो सेपियन ही अखेरची मानवजाती ठरली आहे. (युव्हाल ने मांडलेल्या थेरीबद्दल बऱ्याच अभ्यासकांना आक्षेपही आहे असं विकिपीडियात तरी म्हटलं आहे. )

इ. पू. सत्तर हजार ते इ. पू. तीस हजार या कालावधीत नीअंडरथल चा नायनाट करणारे, त्यांच्यातले काही गट ऑस्ट्रेलियात जावून स्थायिक होणारे, होडी, तेलाचे दिवे, धनुष्यबाण, शिवण टिपण करणारे, कलाकृती आणि अलंकार म्हणता येतील अशा वस्तू तयार करणारे, सत्तर हजार वर्षांपूर्वीचे सेपियनस् हे आपल्या प्रमाणेच बुद्धिमान, सर्जनशील आणि संवेदनक्षम असल्याचं संशोधकांचे मत आहे. आणि हा सगळा cognitive revolution cha परिणाम. हे असं का झालं, फक्त सेपियनस् च्या मेंदूत अंतर्गत बदल होऊन, जनुकात बदल होऊन तेच यशस्वी का ठरले, नीअंडरथल मध्ये हे बदल का नाही झाले याची कारणे शोधण्यापेक्षा त्याचे परिणाम शोधणं शास्त्रज्ञांना जास्त महत्त्वाचे वाटले.

भाषेचा उगम :
अन्न कुठे आहे आणि धोक्याची सूचना या कारणांसाठी भाषा इतर प्राण्यांप्रमाणे सिपियन मध्ये जन्माला आली. पण ती इतर प्राण्यांपेक्षा विलक्षण लवचिक ठरली, अर्थात असंख्य वाक्यांची रचना, मर्यादित आवाज, वाक्यांचे वेगवेगळे अर्थ, माहिती मिळवणे साठवणे आणि देवघेव करणे, चर्चा करणे, आपल्या जवळचं ज्ञान इतरांना देणे यामुळं आपली भाषा उत्क्रांत झाली. थोडक्यात काय तर गॉसिपिंग हा किडा तेव्हा पासून म्हणजे इ. पू. सत्तर हजार वर्षांपूर्वी ही अस्तित्वात होता. तेव्हा सेपियन्स नी जी भाषिक कौशल्ये आत्मसात केली त्यातलं एखाद्याच्या पाठीमागे बोलणे (back biting) हे आजच्या काळात टीकेचं धन बनलं असलं तरी सत्तर हजार वर्षांपूर्वी त्याचा उपयोग एकमेकांना सहकार्य करण्यासाठी त्यांना झाला. कधीच न पाहिलेल्या किंवा स्पर्श न केलेल्या किंवा वासही न घेतलेल्या गोष्टींवर केवळ सेपियन्सच बोलू शकत असत. त्यामुळे cognitive revolution मध्ये देव, धर्म, राक्षस, दंतकथा, परिकथा याचा उगम झाला, असं मत युव्हाल ने मांडलेले आहे, हे सगळ्या अभ्यासकांना पटणारे आहेच असे नाही पण हा भाग फारच सुंदर पद्धतीने पुस्तकात मांडला आहे.
हे कल्पना करण्याचं सामर्थ्य फक्त सेपियन्स कडेच होतं. त्यामुळे सामुदायिक स्वरूपात कल्पना करण्याची कुवतही त्यांना मिळाली. बायबल मधल्या विश्र्वनिर्मितीच्या कथा, भगवत गीतेतल्या कथा या गोष्टी अस्तित्वात आल्या, यामुळं त्यांना एकमेकांना मोठ्या संख्येने सहकार्य करण्याची क्षमता प्राप्त झाली. देवासारख्या कधीही प्रत्यक्षात न पाहिलेल्या, अनुभवलेल्या संकल्पनेवर करोडो लोक विश्वास ठेवू शकतात ते याच सामर्थ्यामुळे. इतर प्राणीही एकमेकांना सहकार्य करतात पण निकट परिचयात असलेल्या गटांपुरतेच ते मर्यादित असते. पण सेपियन्स असंख्य अपरीचितांबरोबरही या कल्पना करण्याच्या सामर्थ्यामुळे सहकार्य करू शकतात, म्हणूनच सेपियन्स ने जगावर राज्य केलं. मला हे वाचताना हा संदर्भ आजवरच्या युद्धामध्ये ही काही अंशी लावावा वाटला. छत्रपतींनी स्वराज्याचे स्वप्न आधी स्वतः पाहिले आणि ती कळकळ, ते स्वप्न सगळ्या मराठ्यां मध्ये जागवले. पहिले महायुद्ध, दुसरे महायद्ध, भारताचे ब्रिटिशांच्या तावडीतून सुटून स्वतंत्र अस्तित्वाचे अर्थात स्वातंत्र्याचे स्वप्न....त्यासाठी जीवाला जीव देण्याची तडफ हे सगळं कल्पना शक्तीच्या आणि त्यामुळे एकमेकांना केलेल्या सहकार्या च्या जोरावरच शक्य झाले असेल असे वाटले. हा परिच्छेद पुस्तकात खूप सोप्या पण परिणामकारकतेने मांडला आहे. 

काळाच्या ओघात लोकांनी कथांचं क्लिष्ट जाळं गुंफलं. त्याला अभ्यासकांनी ' कल्पित वास्तव ' असं नाव दिलं.
'कल्पित वास्तव' ही अशी बाब आहे जिच्यावर प्रत्येकाचा विश्वास असतो. Cognitive revolution मुळे सेपियन्स अशा दुहेरी वास्तवात जगत आले आहेत. एका बाजूला नद्या, झाडं, डोंगर, सिंह हे वस्तुनिष्ठ वास्तव आणि दुसऱ्या बाजूला देव, धर्म, राष्ट्र, संघटित संस्था यासारखं कल्पित वास्तव. जसजसा काळ पुढे गेला तसतसे हे कल्पित वास्तवच जास्त बलवान होत गेलं आणि आता तर त्याचं बळ इतकं वाढलं की झाडं, डोंगर, नद्या, सिंह यांचं जगणं सर्व शक्तिमान ईश्वर, युएसए, गुगल या सारख्या कल्पित गोष्टींच्या उपकारांवर अवलंबून आहे.'
हा संदर्भ आणि त्याचा आताच्या जगावर होत असलेला परिणाम हे लेखकाचं relational observation मला कमालीचं तुफान वाटलं. या सगळ्यामुळे 'धर्म, जात, आमच्यात हे चालत नाही, ते केलं तर पाप असतं' हे जे आपल्या अवतीभोवती कायम चालू असतं, या सगळ्या कल्पित वास्तवाचा पाया कसा भुसभुशीत आहे, मनाच्या खेळांवर तो कसा अवलंबून आहे असं मला वाटायला लागलं.

प्राचीन मानवाची वर्तन पद्धती ही लाखो वर्ष एका ठराविक पद्धतीची राहिली होती, सेपियन्स मात्र दशकाच्या वा दोन दशकाच्या काळात सामाजिक रचना, आर्थिक व्यवहार या अशा पद्धती बदलू शकत असत, हीच त्यांच्या यशाची आजवरची गुरुकिल्ली आहे.
हे विशिष्ट्य निअंडरथल मध्ये नव्हतं, 'सिंह मागावर आहे का? हे ते सांगू शकत असले तरी, देवतांच्या कथा रचण्याचे, त्यात बदल करण्याचे थोडक्यात कल्पित गोष्टी रचण्याचे सामर्थ्य त्यांच्यात नव्हते, तसेच वेगाने येणाऱ्या आव्हानांशी ते आपलं वर्तन जुळवून घेवू शकत नव्हते. तसेच व्यापार ही एक व्यावहारिक कृती आहे आणि सेपियन्स खेरीज कोणीही प्राणी यात गुंतलेला आढळत नाही ही fact आहे.

लेखकाच्या मते, Cognitive revolution हा एक असा पॉइंट आहे ज्यामुळे इतिहास ही शाखा biology पासून वेगळी झाली. याचा अर्थ असा की, या revolution नंतरच्या सेपियन्सच्या विकासाचे स्पष्टीकरण biology ऐवजी ऐतिहासिक साधनांनी केलं. होमोसेपियन्स च्या वर्तनाचे आणि कुवतीचे परिणाम biology ठरवते पण ते वर्तन समजून घेण्यासाठी उत्क्रांत होत गेलेल्या सेपियन्सच्या कृतींचं वर्णन करणं आवश्यक आहे, ते इतिहासाच्या आधाराने होते. 

Agriculture revolution पूर्वी या भूतलावर पाच दशलक्ष ते 8 दशलक्ष लोक राहत होते. ही संख्या सध्याच्या मुंबईच्या लोकसंख्येपेक्षाही कमी होती. हे लोक लहान लहान टोळ्यांमध्ये राहत, ते भटके होते. हजारो वेगवेगळ्या जमातींमध्ये ते विभागलेले होते, त्यांची भाषा, संस्कृती भिन्न होत्या. Cognitive revolution मुळे मिळालेल्या 'काल्पनिक कथानक रचण्याच्या ' क्षमतेमुळे त्या टोळ्यांमध्ये पुष्कळ विविधता होती. 
पंधरा हजार वर्षांपूर्वी होमो सेपियन्सने माणसाळवलेलं पहिलं जनावर म्हणजे कुत्रा. सागर किनाऱ्यावर, नदी काठावर त्यांच्या वसाहती होत्या. पंचेचाळीस हजार वर्षांपूर्वी ही मासेमारी करणारी गावं स्थापन झाली असावीत.
अन्न गोळा करण्याबरोबरच ज्ञान मिळवण्यासाठी ही( उदा. कुठली  विषारी आहे, कुठलं पोषक) हे सेपियन्स स्थलांतरित होत राहिले. 

क्रमशः 

अश्विनी वैद्य 
१४. ०२. २०


राजस्थान डायरी : उदयपूर

उदयपूर - कॅपिटल ऑफ मेवाड - City of lakes, झिलों का शहर असलेल्या राजस्थान मधील या सुंदर ऐतिहासिक शहराला भेट देणं म्हणजे कला, राजस्थानी स्थाप...