Sunday 10 May 2020

सुख म्हणजे नक्की काय असतं !


"सुख म्हणजे नक्की काय असतं?  काय पुण्य असलं की ते घर बसल्या मिळतं !"

प्रशांत दामले यांचं एका नाटकातलं हे गाणं... बऱ्याचदा सगळ्यांनी ऐकलेलं. सध्या तर बाहेरच्या covid 19 च्या परिस्थिती मुळं हे सुख घर बसल्याच किंवा घरात बसण्यातच कसं शोधायचं आहे हे ही सगळ्यांना जमू लागलंय...! 



पण खरंच, जगात सगळ्या घडामोडी या सुखासाठीच तर चालू असतात की. सुख, आनंद, समाधान हे मिळवण्याचाच तर सगळा आटापिटा. तात्कालिक सुख, दीर्घकाळ टिकणारे सुख. म्हणजे मी खूप वाट बघत असलेला movie Netflix किंवा prime वर आला की मी आनंदी. उठल्यावर बाहेर सुंदर उन पडलेलं दिसलं की मी खूष, खूप दिवसांनी मला गरमागरम आयता वडापाव खायला मिळाला की मी तुफान खूष, हवा तसा job मिळाला की मी अगदी ' आज मैं उपर, असमान नींचे..' वैगेरे टाइप भन्नाटच खूष. मला respect, appreciation मिळालं की मी मनापासून समाधानी, या आणि अशा माझ्या आनंदाच्या रोज बदलणाऱ्या व्याख्या. 

भरपूर लेख, पुस्तकं केवळ या सुखाच्या शोधाच्या निमित्ताने नामांकित मानस शास्त्रज्ञ, लेखक यांच्याकडून लिहिली गेली. बरीच तत्वज्ञाने मांडली गेली. सुखाच्या वेगवेगळ्या व्याख्या वाचायला मिळाल्या. पण तरी, हा आनंद किंवा सुख, हे feeling नक्की काय आहे, त्याची तीव्रता कशावर अवलंबून आहे, ते मोजण्याचे काही तंत्र आहे का? प्रत्येकाची सुखाची परिभाषा खरंच मुळातच वेगळी असते का? या आणि अशा बऱ्याच गोष्टींचा उलगडा सपियेन पुस्तकात शेवटच्या भागात वाचायला मिळाला आणि त्यावरून जे वाटले ते लिहिले आहे. 

1. आधुनिक तंत्रज्ञान आणि नवनवीन शोध ज्यामुळे दैनंदिन जीवन आधीच्या पिढ्यांपेक्षा सुकर आणि सोपे झाले. सुखी झाले. मेडिकल सायन्स, टेक्नॉलॉजी मधली अफाट वाढ यामुळे मृत्युचे प्रमाण ही कमी झाले त्यामुळं माणसं आधीपेक्षा नक्कीच सुखी झाली. पण या शोधांमुळे माणसाचा अंगभूत कल आणि प्रवृत्ती यांच्या संपूर्ण अभिव्यक्तीला वाव मिळणं कमी झालं, आणि त्यामुळं आरामदायी आयुष्य जगता येवूनही सुखाचं मृगजळ लांबच राहिलं आहे असंच वाटतं. 

यात भर म्हणजे, गेली काही दशकांमध्ये नैसर्गिक संपत्तीच्या अनिर्बंध उपभोगामुळे पृथ्वीवरच्या पर्यावरणाचा तोल अनेक नवनव्या प्रकारांनी आपण बिघडवला आहे, ज्याचे भयानक परिणाम भविष्यात नक्कीच भोगावे लागणार आहेत.

2. पैसा सुख देतो' हे एक कुतूहल जनक विधान. अधिक पैसा म्हणजे जास्त सुख. म्हणजे पगार दुप्पट झाला, शेअर्स returns दणकून मिळाले की खूप आनंद. पण यातून मिळणाऱ्या सुखाचा आवेग फार तर महिनाभर टिकतो. नंतर त्याची सवय होते आणि त्यात नावीन्य राहत नाही... थोडक्यात त्या गोष्टीमुळे मिळालेले सुख काही दिवसांनी लोपते. 

3. आरोग्य, आहार आणि संपत्ती या घटकांच्या उपलब्धतेच्या आधारावर सुखाचा विचार केला तर आरोग्यदायी आणि श्रीमंत लोक अधिक सुखी असायला हवे होते पण तसंही होत नाही. 

4. लोकशाहीत राहणारे लोक हुकुमशाहीत राहणाऱ्या लोकांपेक्षा अधिक सुखी आहेत का? याचेही उत्तर ठामपणे हो किंवा नाही असे देता येईलच असेही नाही. 

5. कुटुंब आणि समाज याचाही सुखावर खूप impact असतो. ज्यांचे त्यांच्या कुटुंबातल्या लोकांशी, समाजातल्या लोकांशी चांगले निखळ संबंध असतात ती माणसं अधिक सुखी राहतात. सामाजिक, नैतिक आणि अध्यात्मिक घटकांचा प्रभावही सुख या संकल्पनेवर असतोच. 

6. सुखी सहजीवन याचाही सुखाच्या मापात भर पडण्यात हातभार असतो. पण याचा अर्थ असा नाही की विवाहामुळे सुख निर्मिती होते. आणि विवाहित लोक एकेकटे राहणाऱ्या लोकांपेक्षा सुखीच असतात असे सरळसोट विधान करणेही दरवेळी बरोबरच ठरेल असे नाही. 
एखाद्या अपंग व्यक्तीला प्रेमळ जोडीदार, जीवाला जीव देणारं कुटुंब, दिलासा देणारा मित्रपरिवार लाभला तर ती व्यक्ती एकलकोंड्या, आरोग्य संपन्न अब्जाधीशा पेक्षा आत्यंतिक सुखाचा अनुभव घेईल यात वादच नाही.

7. सुख हे व्यक्तिनिष्ठ आकांक्षा वर अवलंबून असतं. तसंच इतर लोक आपल्या तुलनेत किती सुखी आहेत यावरही आपलं सुख अवलंबून असतं. इतरांच्या भौतिक स्थितीवर आपण आपल्या आकांक्षा चिकटवतो आणि त्यांच्या सुखाचा अंदाज बांधतो.

जर जगण्याला उद्देश असेल तर कितीही कष्ट आणि ते कसेही सहन करून, अर्थपूर्ण असलेलं जीवन कमालीचं समाधान देणारं असू शकतं. उदा. देशासाठी सीमेवर लढणारे जवान, स्वातंत्र्याच्या ध्येयाने पेटून उठलेले क्रांतिकारी, वेगवेगळे शोध लावणारे शास्त्रज्ञ, astronauts, आदिवासींसाठी काम करणारे doctors, ही त्याचीच उदाहरणे. 

इथे केलेल्या कर्मातून मृत्यूनंतर स्वर्गात मिळणाऱ्या सुखावर ज्यांची श्रद्धा आहे ते लोक ज्यांची अशी श्रद्धा नाही अशा नास्तिक, निधर्मी लोकांपेक्षा नक्कीच सुखी असावेत. कारण मृत्यूनंतर संपूर्ण आणि अर्थहीन अशा विस्मृतीत जाणाऱ्या अस्तित्वाशिवाय दुसऱ्या कशाचीच अपेक्षा ते ठेवू शकत नाहीत. 

जे हवं ते मिळवण्या पेक्षा जे आहे त्यात समाधान मानणं अधिक महत्त्वाचं असल्याचं कवी, तत्ववेत्ते यांनी फार पूर्वीच सांगून ठेवलं आहे. आपल्या साधू संतांनीही म्हटलं आहे ' ठेविले अनंते तैसेचि रहावे, चित्ती असू द्यावे समाधान. ' सुख म्हणजे, दुःखी क्षणांपेक्षा, आनंदी क्षणांचं अधिक्य. पण पुन्हा व्यक्ती सापेक्षते नुसार कोणते क्षण दुःखी आणि कोणते आनंदी हेही सापेक्षच. 

या सगळ्या वरून सुख कशा कशावर अवलंबून असतं ते लक्षात येतंय, पण आनंद होतो म्हणजे शरीरात नक्की काय होतं,  याचंही शास्त्रीय विश्लेषण जाणून घेणं महत्वाचं आहे. आपलं मानसिक आणि भावनिक जग वेगवेगळ्या रासायनिक घटकांनी नियंत्रित केलं जातं. मज्जा तंतू, neurons, सेरोटीन, डोपामाइन वैगेरे रासायनिक घटकाच्या पातळीवर ते अवलंबून असतं. म्हणजे लॉटरी लागल्यामुळे, घर विकत घेतल्यामुळे, चांगला जॉब मिळाल्यामुळे कुणीही सुखी होत नाही. लोक फक्त एका आणि एकाच गोष्टीनं - शरीराला झालेल्या सुखकारक संवेदनेनं सुखी होतात. खूप आनंदाने एखादी व्यक्ती उडी मारते म्हणजे, त्या व्यक्तीत त्या वेळी तयार झालेल्या हार्मोन्स आणि मेंदूच्या वेगवेगळ्या भागात झालेल्या रासायनिक क्रियांचा तो परिणाम असतो.

आता ही सगळी सुखाच्या संवेदनेनं शरीरात होणारी रासायनिक क्रिया सुखाची एक ठराविक पातळीच कायम राखते. जगण्यासाठी प्रोत्साहन देणं आणि निराश करणं एवढ्या पुरतीच सुख आणि दुःख यांची भूमिका असते. त्यामुळं आपण कायम सुखीच किंवा कायम दुखीच राहणार नाही याची काळजी निसर्गानेच आधी घेतलेली आहे.

आवडीच्या चमचमीत जेवणावर मनसोक्त ताव मारल्या वर मिळणारी तृप्तता जर कायम टिकून राहिली तर आपण परत जेवणारच नाही आणि भुकेने मरून जावू. त्यामुळं त्या तृप्ततेतून मिळणारं समाधान हे थोड्याच काळात संपतं... ते संपणं हेच पुढे जगत राहण्यासाठी गरजेचं आहे, शरीरात नैसर्गिकच तशी व्यवस्था आहे.

मानसिक सुख नियंत्रित करणारी ही शरीरातली रासायनिक व्यवस्था व्यक्ती गणिक भिन्न असते. 1 ते 10 या मापत आनंदाची मोजणी केली तर काही लोक जन्मतःच आनंदी रसायन घेवून जन्माला येतात, त्यांची सुखाची पातळी त्यामुळं 6 ते 10 मध्ये हेलकावे खाते आणि वयोपरत्वे ती 8 वर स्थिरावते. अशा लोकांना job गेला, मोठं नुकसान झालं, आरोग्य ढासळलं तरी ते फारसे दुःखी होत नाहीत. याउलट खिन्न रसायन घेवून जन्माला आलेली व्यक्ती तिला शंभर कोटींची लॉटरी लागली किंवा, दीर्घकालीन आजार अचानक बरा झाला, career मध्ये खूप मोठं काहीतरी अवघड achieve केलं तरी अशी माणसं निराशाच राहतात. सुखाच्या सातव्या पातळीपेक्षा अधिक सुख त्यांना घेताच येत नाही.

याची कितीतरी उदाहरणे आपल्याला कायम आजूबाजूला दिसतात. काहीही झालं तरी काही लोक तुलनेनं कायम अधिकच आनंदी असतात. आणि जगानं, नशिबानं कितीही मेहरबानी केली तरी काही लोक मात्र कायम कुरकुरणारेच असतात. डिफॉल्ट निराश रहण्याकडेच त्यांचा कल अधिक असतो. 

मातीच्या सध्या घरात राहणारी व्यक्ती आणि आलिशान बंगल्यात राहणारी व्यक्ती यांच्या सुखाची तुलना केली तर मातीचं घर किंवा आलिशान बंगला त्या व्यक्तींची मनस्थिती ठरवू शकत नाहीत पण त्यांच्या मेंदूत स्त्रवणारे सेरोटोनीन मात्र त्यांची मनस्थिती ठरवू शकते.  म्हणजे स्वतःच्या हक्काचे मातीचे घर बांधून झाल्यावर त्या व्यक्तीच्या मेंदूत जेवढं सेरोटोनीन स्त्रवायला लागलं तितकंच दुसऱ्या व्यक्तीचा स्वतःचा बंगला बांधून पूर्ण झाल्यावर त्याच्या मेंदूत स्त्रवलं. त्यामुळं दोघांच्याही आनंदाची पातळी 10 च म्हणजे समानच झाली. त्यांना एकाच मापाचे सुख मिळाले. 

थोडक्यात काय तर, पैसा, सामजिक प्रतिष्ठा, घर, गाडी, सत्तेचे पद, वाहव्वा, यापैकी कोणतीही गोष्ट सुख देत नाही तर मेंदूत स्त्रवणारं सेरोटनिन, डोपामाइन, ऑक्झीटोसिन मुळं सुख निर्मिती होते. या सगळ्या सायंटिफिक विश्लेषणा वरून एक गोष्ट रुढार्थाने खरी जाणवली जी गोष्ट आपले साधू संतही अनेक वर्ष सांगत आले आहेत ती ही की, ' सुखाची सुरुवात आपल्या आतूनच होते ' 

Sapiens पुस्तकात, सुखाबाबत विवेचन करताना बौद्ध धर्मात सुखप्राप्ती बद्दल जे तत्वज्ञान सांगितले आहे ते वाचणे खूप कुतूहल जनक वाटले. समुद्रात तयार होणाऱ्या लाटांप्रमाणेच मनात तयार होणाऱ्या संवेदना असतात, पाच मिनिटांपूर्वी आपल्याला आनंदी आणि ध्येयनिष्ठ वाटत असतं आणि पाच मिनिटानंतर दुःखी, निराश वाटायला लागतं. बौध्द धर्माच्या मते, वेदना, नैराश्य किंवा अर्थहीनता हे दुःखा चं मूळ नाही तर त्या सुखाच्या क्षणिक संवेदनांचा कधीही न संपणारा अर्थशून्य पाठलाग हे दुःखाचं मूळ कारण आहे. या पाठलागा मुळे मन कधीच समाधानी राहत नाही. मला हे वाचताना आईने लहानपणी सांगितलेले एक उदाहरण आठवले, ' आपल्याला घरातून निघताना गाडी पकडायची असते, तेव्हा घरातून निघताना पहिली अपेक्षा गाडी मिळावी इतकीशीच, मग गाडी मिळते, मग बसायला किमान जागा मिळावी ही अपेक्षा, मग ती ही मिळाल्यावर, जरा खिडकी शेजारची मिळाली तर किती बरं होईल ही अपेक्षा...!' असा तो अपेक्षांचा थोडक्यात सुखाच्या संवेदनेचा पाठलाग संपतच नाही. आपल्या भावनांना आपण जितकं जास्त महत्त्व देतो तितक्या उत्कटतेने आपण सुखाचा पाठलाग करतो, आणि अधिक दुःखी होतो. सुखाचा पाठलाग म्हणजे विशिष्ट भवानिक स्थितीचा पाठलाग. पण जेव्हा हा पाठलाग थांबतो तेव्हा मन समाधानी असतं. मग अशा वेळी, आनंद, राग, कंटाळा, वासना निर्माण होतात आणि लोपतात. त्या संवेदना आहेत तशा स्विकारल्या जातात, ' काय झालं असतं, या कल्पनाविश्वात मन रमत नाही. त्यामुळे सुखाच्या संवेदनेचा पाठलाग होत नाही. यातून मिळणारी शांतता कमालीची गाढ असते.

बौद्ध धर्मात सांगितलेले हे सुखाबाबतचे तत्वज्ञान मला आपल्या काही मनाच्या शलोकांमध्येही सांगितले आहे असे वाटले. लहानपणी ऐकताना ते नीटसे कळत नव्हते पण आता माझ्याच मुलांना ऐकवताना त्याचे अर्थ नव्याने स्पष्ट होत आहेत. असो, स्थितप्रज्ञता ही फेज त्या आंतरिक शांततेहून काही वेगळी असेल का? आणि ती मिळवण्यासाठी मनाला trained कसे करायचे हे सांगणारे मार्ग अध्यात्म, ध्यान धारणा आणि योग साधना वैगेरे गोष्टींकडे नेणारे असावेत कदाचित.
 
या सगळ्या सुखा बाबतच्या विश्लेषणावरून, गदिमांची ' सुख' ही कविता इथे नक्कीच अर्थपूर्ण वाटते, एक छोटंसं कुत्र्यांचं पिल्लू आणि वयस्कर कुत्रा यांच्यातला संवाद म्हणजे गदिमांची ' सुख ' ही कविता.


एका वटवृक्षाखाली बसुनिया दोन श्वान
एकमेकांना सांगती अनुभव आणि ज्ञान;

एक वये वाढलेले, एक पिलू चिमुकले,
वृद्ध-बालकात होते काही भाषण चालले।

"कोणाठाई सापडले तुला जीवनात सुख?"
वृद्ध बालका विचारी त्याचे चाटुनिया मुख ।

"मला वाटते, आजोबा, सुख माझ्या शेपटात,
सदाचाच झटतो मी त्यास धराया मुखात ;

माझ्या जवळी असून, नाही मज गवसत,
उगाचंच राहतो मी माझ्या भोवती फिरत"

अजाणत्या बालकाची सौख्य कल्पना ऐकून,
क्षणभरी वृद्ध श्वान बसे लोचन मिटून ;

"कोण्याठायी आढळले तुम्हा जीवनात सुख?
तुम्ही वयाने वडील, श्वान संघाचे नायक"

बाल श्वानाच्या प्रश्नाला देई जाणता उत्तर,
"तुझे बोलणे बालका, बिनचूक बरोबर;

परी शहाण्या श्वानाने लागू नये सुखापाठी,
आत्मप्रदक्षिणा येते त्याचे कपाळी शेवटी;

घास तुकडा शोधावा वास घेत जागोजाग….
पुढे पुढे चालताना पुच्छ येते मागोमाग…! "



अश्विनी वैद्य
10.05.20


राजस्थान डायरी : उदयपूर

उदयपूर - कॅपिटल ऑफ मेवाड - City of lakes, झिलों का शहर असलेल्या राजस्थान मधील या सुंदर ऐतिहासिक शहराला भेट देणं म्हणजे कला, राजस्थानी स्थाप...