Monday 3 December 2018

' बोले तो एकदम.... कड्डक '





....आणि डॉ. काशिनाथ घाणेकर. हा बहुचर्चित चित्रपट काल मोठ्या पडद्यावर इंग्लंडात पाहिला. या चित्रपटाबद्दलचे बऱ्याच जणांचे चांगले वाईट reviews गेल्या आठवड्यात वाचले होते. ते reviews वाचून आणि ट्रेलर्स बघून सिनेमा बद्दल खूप उत्सुकता होती. 
खरंतर या अभिनेत्याच्या लोकप्रियतेचा काळ अनुभवलेली माझी पिढी नाही. म्हणजे, दर रविवारी दुपारी चार वाजता संध्याकाळच्या चहा बरोबर सुरु होणारे लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ यांचे मराठी चित्रपट शाळेत असताना दूरदर्शनवर पाहिलेली माझी आत्ताची तिशीतली पिढी. त्यांच्यासाठी घाणेकर म्हणजे 'हा खेळ सावल्यांचा' या चित्रपटातून माहित झालेला घाऱ्या डोळ्यांचा नायक, 'गोमू संगतीनं...' या त्याच्या केवळ गाण्याच्या रेफरन्सनेच लक्षात असलेला. अर्थात त्यांनी गाजवलेली बरीच नाटके केवळ ऐकून माहित होती, पण प्रत्यक्षात कधीही पहिली नव्हती. कुठे एखाद्या लेखाच्या निमित्ताने किंवा पुस्तकातल्या रेफरन्सने थोडाफार माहित असलेला हा अभिनेता. तर थोडक्यात, या अभिनेत्याची खूप तुटपुंजी ओळख मला होती. त्यामुळं 'डॉ. काशिनाथ घाणेकर' या नावाच्या भोवती असणाऱ्या त्याकाळच्या लोकप्रियतेच्या वलयासाठी हा सिनेमा बघायचा असा काही माझा हेतू नव्हता. त्यांच्या कारकिर्दीचा सुवर्णकाळ पुन्हा एकदा उलगडून दाखवणाऱ्या या सिनेमाच्या ट्रेलर मध्ये दिसलेल्या घाणेकरांच्या व्यक्तिरेखेतला सुबोध बघण्यात मला खरा रस होता. आणि मराठी पॉपकॉर्नच्या कृपेने आज इंग्लंड मध्ये मला तो मोठ्या स्क्रीनवर बघता आला. 


कुठलाही बायोपिक चित्रपट त्या व्यक्ती बद्दलची थोडक्यात तोंड ओळख करून देऊ शकतो, पण तो चित्रपट त्या व्यक्तीची जीवन कथा, सार वैगेरे सांगू शकतो असे मला वाटत नाही. खऱ्या आयुष्यात घडलेल्या घटना चित्रपटात जशाच्या तशा उमटवताच येऊ शकत नाहीत. दोन-अडीच तासाच्या रोलमध्ये आयुष्यात घडलेल्या ठळक घटना इतर कोणाच्या तरी दृष्टिकोनातून फार फार तर दाखवता येतात. पण त्यावरून, घडलेले प्रसंग त्याचे रेफेरेंन्सस यावरून चूक, बरोबरची अनुमानं काढून ठराविक लेबलं प्रिंट करणं आणि ती त्या व्यक्तीला चिकटवणं हेही बरोबर वाटत नाही. त्यामुळे मी हा सिनेमा बघताना, ती एक कलाकृती म्हणून पहिला. त्यातले संदर्भ, त्या काळातल्या इतर दिग्गज व्यतिरेखा, त्यांची एकमेकांबरोबरची नाती, त्यांचे स्वभाव केवळ एखाद्या कथेतल्या पात्रांचे स्वभाव, कथेचा गाभा म्हणून तितक्या दर्जेदार उमटल्यात का या दृष्टीने मी पहिले आहे. त्यावरून त्याबद्दलचे मत मांडत आहे. इतर चित्रपटांना जशी एक कथा असते आणि ती परिणामकारकपणे प्रेक्षकांसमोर मांडण्याचे कसब चित्रपटाचा दिग्दर्शक, संवाद लेखक, कलाकार, निर्माते आणि पूर्ण टीमचे असते तसेच यालाही आहे. फक्त इथली कथा ही एका खऱ्या व्यक्तीची खरी कथा आहे. 

अभिजित शिरीष देशपांडे यांनी चित्रपटाचे अतिशय उत्तम लेखन आणि दिग्दर्शन केले आहे यात शंकाच नाही. प्रसंग इतके सुंदर आणि उठावदार मांडले आहेत. घाणेकरांच्या आयुष्यातले कुठले प्रसंग सिनेमामध्ये दाखवावेत याची नेमकी जाण त्यातून दिसते. वसंत कानेटकर लिखित ' रायगडाला जेव्हा जाग येते... ' या नाटकातून घाणेकरांनी साकारलेला संभाजी इतिहासातल्या संभाजी इतकाच तंतोतंत उभा करून खरा संभाजी लोकांपर्यंत पोचवण्याचा बिनतोड प्रयत्न करून अजरामर केला आणि घाणेकरांच्या रंगभूमीवरच्या करिअरला तिथून सुरवात झाली. हा भाग सिनेमामध्ये खूप उत्कृष्ट संवाद लेखन आणि प्रसंग यातून मांडला आहे. घाणेकरांच्या शीघ्रकोपी, संतापी स्वभावामुळे त्यांचे कानेटकरांशी उडालेले खटके, पराकोटीचे वाद त्यामुळे त्यांच्या कारकिर्दीत आलेले चढ उतार, पण तरीही स्वतःच्याच मतांप्रमाणे पुढची वाट तयार करत गाजवलेली रंगभूमी हे सगळं या चित्रपटात सुबोधने इतकं चपखल साधलं आहे कि त्याला तोड नाही. खरे घाणेकर कसे असतील याचे संदर्भ शोधत राहण्यापेक्षा सुबोधने साकारलेले घाणेकर मनाचा ठाव घेतात, हे मात्र नक्की. 'अश्रूंची झाली फुले' या अजरामर झालेल्या नाटकातील 'लाल्या' या घाणेकरांनी साकारलेल्या पात्राने तर त्या काळाच्या रसिकांना वेड लावले, कॉलेजकुमार कधी नव्हे ते नाट्यगृहात त्यांची नाटकं बघायला येऊ लागले, त्यांचे लोकप्रिय डायलॉग्ज त्याकाळी प्रत्येकाच्या तोंडी असायचे. हे सारं  सिनेमात बघताना त्या काळात म्हणजे साठ ते सत्तरच्या दशकात आपण सहज जाऊन पोचतो, एका सेकंदासाठीही चित्रपट कुठे रेंगाळतोय असं वाटत नाही. सुलोचना दीदींमुळे मराठी सिनेसृष्टीत पाऊल टाकून तिथेही स्वतःच्या अभिनयाच्या जोरावर अनेक इतिहास रचत वाटचाल करणारे देखणे घाणेकर एक अभिनेते म्हणून खरंच खूप भावतात. या सगळ्या प्रवासात त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात त्यांच्या पहिल्या पत्नी डॉ. इरावती घाणेकर यांच्या बरोबरचे त्यांचे नाते, त्यांना समजून घेणारी, सुलोचना दीदींची मुलगी कांचन हिचे त्यांच्या आयुष्यात हळुवार येणे हे सगळे प्रसंग या सिनेमात अगदी ओघवते उभारले आहेत. सुमित राघवनने साकारलेले डॉ. लागू, मोहन जोशी यांनी साकारलेले भालजी पेंढारकर, प्रसाद ओकने उभे केलेले घाणेकरांचे जीवश्च मित्र प्रभाकर पणशीकर आणि सोनाली कुलकर्णीने साकारलेली सुलोचना या सगळ्यांनीच महान कामे केली आहेत, म्हणजे अगदी पूर्ण सिनेमात दोन- तीन मिनिटांसाठी पिंजरा चित्रपटातल्या 'तुम्हावर केली मी मर्जी बहाल...' या गाण्यातून दिसणारी अमृता खानविलकर सुद्धा संध्या लाजवाब उभी करते, तिच्या हातांच्या आणि मानेच्या विचित्र हालचाली अमृताने हुबेहूब टिपल्या आहेत. 


आनंदी गोपाळ, इथे ओशाळला मृत्यू, गारंबीचा बापू अशी बरीच नाटके अजरामर करून रंगभूमी गाजवत, मराठा तितुका मेळवावा, मानला तर देव, हा खेळ सावल्यांचा हे आणि असे अनेक चित्रपट गाजवणारा पणशीकरांच्या मते, मराठी चित्रपट सृष्टीतील अखेरचा सुपरस्टार डॉ. काशिनाथ घाणेकर यांची ही ओळख या चित्रपटाच्या निमित्ताने नक्की घडते. नेहमीच उत्तम अभिनय करत अनेक व्यक्तिरेखा सुंदर रंगवत, हल्ली सगळ्यांच्या घरात त्यामुळेच लोकप्रिय असलेल्या सुबोधने त्याच्या उच्च अभिनयाने याही भूमिकेचे सोने केले आहे. 


त्या काळी घाणेकरांच्या अभिनयावर वेडी झालेली ती पिढी, कलेवर निस्सीम प्रेम करत त्याला तितकीच उस्फुर्त दाद देणारे, धो धो पावसात, गुडघाभर पाण्यात, पाणी गळत असलेल्या थिएटर मध्ये नाटक बघायला येणारे तेव्हाचे रसिक प्रेक्षक या  चित्रपटात बघताना त्या काळच्या या हाडाच्या कलाकारांच्या नशीबाचा क्षणभर हेवा वाटतो. कलाकार म्हणून घाणेकरांवर जीव ओतून प्रेम करणारे त्यांचे चाहते, त्यांना वाटेवर भेटलेली माणसे अगदी क्षुल्लक प्रसंगातूनही या सिनेमात लक्ष वेधून घेतात. 


नाटक संपल्यावर प्रेक्षकांच्या गर्दीतून चालत जाताना, लोकांच्या टाळ्यांच्या गडगडाने चढत जाणारी लोकप्रियतेची नशा, दारूच्या नशेपेक्षाही किती घातक असते हेच इथे दिसते. या लोकप्रियतेच्या नशेचा शाप पचवायची ताकद भल्या भल्या दिग्गज्जांना पेलली नाही आणि त्यातलेच एक घाणेकर. निळ्या डोळ्यातली समोरच्याला भेदणारी तीक्ष्ण नजर आणि उच्च अभिनय याच्या जोडीला असणारा संताप, बेफिकीरी, बेदरकार स्वभाव या जन्मतःच चिकटलेल्या भांडवलामुळे एका उत्तम अभिनेत्याचा, उत्कृष्ट आणि देखण्या कलावंताचा व्यसनाधीनतेच्या विळख्यात अडकून करुण अंत होतो. ते त्यांचा अखेरचा श्वास त्यांची प्रेयसी, सखी असलेल्या त्यांच्या रंगभूमीवर 'अश्रूंची झाली फुले' या नाटकाच्या अमरावतीच्या प्रयोगात, प्रयोग चालू असतानाच घेतात. हे सगळं मोठ्या पडद्यावर बघत असताना अगदी भारून जायला होतं हे नक्की, आणि तेच या चित्रपटाचं यश आहे असं मला तरी वाटतं. 


एक अभिनेता, कलाकार म्हणून त्यांच्या कारकिर्दीतले प्रसंग आणि एक माणूस म्हणून त्यांच्या व्यक्तिगत आयुष्यातले प्रसंग, हा गोफ, हा एक चित्रपट आहे याचे भान बाळगून बघितले की हा चित्रपट नक्कीच खूप आवडतो. आणि सुबोधच्या चाहत्यांसाठी तर हा चित्रपट म्हणजे एक मेजवानीच आहे. तेव्हा हा दर्जेदार चित्रपट नक्की बघावाच असा आहे. 

---- अश्विनी वैद्य

Wednesday 5 September 2018

" WhatsApp !" (10 min skit)


पात्र -- आजी, आजीची मैत्रीण, आई, आईची बहीण, लेक, शेजारच्या काकू




(वेळ संध्याकाळ ५ वाजताची. घरात आई, आजी आणि लेक असतात)

आई : (फोनवर) हॅलो ताई

आईची बहीण : हं बोल गं.

आई : अगं पाहिलास का मी आत्ता पाठवलेला फोटो? ब्लाउजचा? तशी डिझाईन कर तू, परवा ती सेल मधून साडी घेतलीस ना मोरपीशी, त्यावरच्या ब्लाऊजला. अगं इतकं cute दिसेल ना ते ताई. आणि हो डिझायनर कडे टाक हं या वेळी शिवायला.

आईची बहीण :
(फोनवर) अजून नाही आला गं फोटो मला. इतका नेटवर्क प्रॉब्लेम आहे ना मेला. या बिल्डिंग मध्ये कधी म्हणून सिग्नल नीट येत नाही बघ. अगं, मीही कोणाला इथून व्हाट्सअँप केलं तरी ते ही पटकन सेंड होत नाही.

आई : अरे देवा

आईची बहीण : बघ ना. आधी एक टिक जाऊन दोन टीका दिसतायेत का ते बघा, मग त्या निळ्या झाल्यात का ते बघा. कधी कधी तर त्या चार चार वेळा चेक केल्यावर सुद्धा त्या काळ्याच असतात गं... काय झोपा काढत असतात कि काय लोक कोण जाणे... पाठवलेला मेसेज बघावा कि नाही पटकन. तरी बरं चोवीस तास फोन सगळ्यांच्या हातातच असतो. जाऊदे. बघेन नंतर तो blouse चा फोटो. पण मला सांग परवाच्या माझ्या चिरोट्यांची रेसिपी काल रात्री तुला व्हाट्सअँप केलीये. ती बघितलीस का?

आई : हो हो वाचली मी ती रेसिपी.

आईची बहीण : आता जेव्हा करशील ना चिरोटे की त्याचा फोटो फेसबुक वर टाक लगेच. आणि मिनिमम दहा लाईक्स आल्या शिवाय खायचे नाहीत हं आजिबात. बरं चल ठेवते, खूप आवरायचं राहिलं आहे अजून. या फोन मध्ये फार वेळ जातो बाई.

आई : हो सांगेन नक्की ताई. चिरोट्यांवरून आठवलं, अगं तू ती बाहुबली थाळी पाहिलीस का व्हाट्सअँप वर, काय राक्षसी प्रकार आहे तो, मला पाच ग्रुप मधून सेम msg आलाय काल. काहीही बाई शी. बर चल, माझीही बरीच कामं राहिली आहेत, ती उरकते. बाय.
(असं म्हणून दोघी call cut करतात मात्र व्हाट्सअप बघत तशाच जागेवर उभ्या राहतात.)
(आतून लेकीची हाक येते, कानात हेडफोन घालून ती फोन वर काहीतरी करतच बाहेर येते)

लेक : आई...! आई..!

(तेवढ्यात हॉल मध्ये बसलेली आजी तिला म्हणते )

आजी : अगं जरा समोर बघून चाल. त्या फोन मध्ये बघू बघू डोळ्याची पार बटणं झाली तुझ्या, धडपडशील हो... बघ समोर, अगं अगं...!
(आणि तेवढ्यात लेक टेबलाला धडकते.)

लेक : (लागल्याच्या स्वरात) आई गं... ! काय गं हे आई, कसं ठेवलंय हे टेबल मध्येच. लागलं ना मला. अगं त्या फोन मधून जरा बाहेर ये की, आमच्या कडे बघ. हॅलो आई...!

आई : बघू कुठं लागलं? अशी कशी धडपडतेस गं?

लेक : किती त्या व्हाट्सअँप वर ऍक्टिव्ह असतेस गं. कंटाळा नाही येत का? सारखं त्या रेसिपीज, डाएट, साड्या आणि दागिने यावरचे बदा बदा मेसेज वाचत असतेस ते. हाऊ इरिटेटिंग !

आई : व्हाट्सअँप वर तेवढंच नाही करत हां मिनू मी. खूप सामाजिक विषयांवर तात्विक चर्चा चालू असतात माझ्या. तुझ्या बाबांबरोबर काय बोलणार? कप्पाळ. ते सगळ्याच गोष्टींना त्यांच्या फोनकडे बघत 'बर' एवढंच म्हणतात. मग मी आपली माझी मतं तावातावाने आमच्या ग्रुप वरच मांडत असते. परवाच राधिका मावशीचा pm (पर्सनल मेसेज) आला मला की, मी किती बरोबर आणि परखड बोलले ग्रुप वर म्हणून. माझे पॉईंट बरोबरच होते, ठासून सांगितले. दिवेकरांची ऋजुता कि दीक्षितांचा डॉक्टर कोणाची वाट धरावी यावर सलग पंचावन्न मिनिटं चर्चा चालू होती आमची ग्रुपवर, मग दिवसभर दर दोन तासांनी कोणीतरी काही मुद्दा मांडून वाद पुढे नेत होतं.

लेक : काय यार आई, काहीही करत असतेस तू.

आई : पण फक्त चर्चेने पोट थोडीच भरणार आहे. नि वजन तरी कुठचं घटणार... भूक लागायची थांबते का, म्हणून मग शेवटी फोन बाजूला ठेवला आणि उठले बाई. कुकर लावला आणि आमटीला फोडणी घातली.

लेक : बर ते जाऊदे, मी बाहेर चालले आहे आत्ता. ट्रेकिंग चा ग्रुप आहे ना माझ् व्हाट्सअँपचा, ते सगळे कॉफीला भेटतोय आम्ही आज. ते तुला सांगायला बाहेर आलेले. पण घरातल्या घरात व्हाट्सअँप करूनच सांगायला पाहिजे होतं, तुझ्या पर्यंत पटकन पोचलं असतं, असं वाटतंय आत्ता. आणि btw, तुझ्या फोन चं सेटिंग change कर ना जरा ते please. दर पाच मिनिटांनी टुंग टुंग वाजत असतं, किती ते messages. वोल्युम तरी कमी ठेव त्याचा. बर चल निघते मी. किती वाजतील यायला ते व्हाट्सअँप करून कळवेन तिकडून नंतर.

आजी : गेली ना मिनू तशीच, तास झालं म्हणतीये तिला, मला ते नूतन चं गाणं पाठवलंय प्रभानं... ते सुरु करून दे म्हणून. त्याच्या खाली लिहिलं होतं, नक्की बघा आणि पुढे ११ जणांना पाठवाल तर तुम्हाला तुमचे तरुणपणीचे दिवस आज रात्री पर्यंत नक्की आठवतील. ते डाउनलोड का काय म्हणतात ते करून दे असं दहा वेळा म्हटलं मिनूला, पण तिच्या हातातल्या फोनपुढे बोललेलं तिच्या कानात घुसेल तर शपथ.

आई : पळाली पोरगी, बघावं तेव्हा नुसती फोन मध्ये गुंग असते. बघू आणा इकडे, मी देते गाणं लावून तुम्हाला. आणि हो आई, आठवलं एकदम. त्याच्या आधी इंदिरा संतांची पण एक सुंदर कविता परवा मला विजू ताईंनी whatsapp केलेली, ती पाठवते तुम्हाला, नंतर निवांत वाचा. तुम्हाला आवडतात ना कविता. आणि हो आत्ता पदमा मावशी येणार होत्या ना आज?
(तेवढ्यात बेल वाजते) आल्याच वाटतं. या मावशी, बसा.

आजीची मैत्रीण (पदमा मावशी) : काय म्हणतेस गं, कशी आहेस? दिसतियेस तरी ठणठणीत. सासूची काळजी घेतेस ना नीट? बरं विसरायच्या आत मुद्द्याचं बोलते लगेच. चहा करायला आत जाशील, त्या आधी माझ्या फोन मध्ये तुझ् वायफाय जोडून दे बाई तेवढं. निघताना लेक म्हणाला whatsapp चालणार नाही माझा. तुझ्या सासूला दोन चार जोक दाखवायचेत गं व्हाट्सअँप वरचे. तेवढं दे बाई करून मला.

आई : हे भारी हां मावशी, एकदम व्हाट्सअँप वैगेरे, आमच्या आईंसारख्याच मॉडर्न आजीबाई आहात कि अगदी. त्या ही बिलकुल मागे नाहीत हां.
(पदमा मावशी आत येऊन बसताना बोलतात.)

आजीची मैत्रीण (पदमा मावशी) : हो, ती मागे कशी असेल? हुश्शारच आहे माझी मैत्रीण. घरात सगळे खाली मुंडी व्हाट्सअँप धुंडी असतील तर ती तरी दुसरं काय करणार, व्हाट्सअँप शिवाय.
आणि तेवढाच जीवाला विरंगुळा गं. मराठी मालिका आणि या whatsapp वरच्या गप्पा, राहिलेल्या दिवसांचे रकाने यातून मिळणाऱ्या आनंदानेच भरतो गं आम्ही म्हाताऱ्या, बाकी काय. लेकाने फोन घेऊन दिला, नातवाने व्हाट्सअँप शिकवला. आता चौघे घरात असो कि बाहेर, एकमेकांशी व्हाट्सअँप करूनच बोलतो.

आजी : बस ग पदमा, फोन चार्जिंगला लावून येते माझा. सकाळपासून चालूच आहे, दुपारी सुनबाईने रामरक्षा लावून दिलेली, माझा डोळा लागला आणि ती तशीच चालू राहिली. संपली बॅटरी. फोन बंद पडेल आता. बुडत्या बॅटरीला चार्जरचा आधार, कसं. बस आलेच. (असं म्हणत आजी तिचा फोन आत चार्जिंग ला लावायला जाते.)

आजीची मैत्रीण (पदमा मावशी) : खरंय गं, आम्ही पण गणपती मध्ये प्रतिष्ठापना, विसर्जन सगळं कसं व्हाट्सअँप मध्ये आलेलं तस्संच केलं अगदी. गुरुजींना बोलावलंच नाही यावेळी. सुनेनं सगळं फोनमध्ये बघू बघू अगदी शास्त्रोक्त पद्धतीने केलं बघ. कुठे काही कमी नाही, विसरलं नाही, की चुकलं नाही. शिवाय गुरुजींची दक्षिणा वाचली.

आजी : हो बाई हे फारच भारी आहे. हिने सुद्धा गौरीला साडी कशी चापून चोपून नेसवली, व्हाट्सअँप वर बघून. एरवी शुभाला दहा फोन करावे लागतात ये साडी नेसवायला म्हणून. यावेळी आम्ही बोलावलंच नाही मग तिला.
(एवढ्यात शेजारच्या काकू परवाची बीटाचे कटलेट्स घालून दिलेली प्लेट परत द्यायला घरी येतात.)

शेजारच्या काकू : आहे का घरात कोणी? तुमची प्लेट परत करायची होती, म्हणून आलेले.

आई : ये की अगं. चहा ठेवलाय बघ, घेऊयात मिळून, बस. आत्ताच बघ गुड इव्हनिंगच्या मेसेजबरोबर चितळ्यांच्या वड्या पाठवल्यात ग्रुप वर कोणीतरी. फोटो बघून चहाबरोबर खाउयात दोघीजणी. ये (दोघी दिलखुलास हसतात)
आजी : काय गं बरी आहेस ना? दोन दिवस झालं कॉलनीतल्या ग्रुप वर मेसेज नाही तुझा? म्हटलं आजारी आहेस कि काय.

शेजारच्या काकू : मी मस्त आहे आजी. गेला आठवडाभर गणपतीत बिझी होते. आणि अगं (आईकडे बघून), चहा वैगेरे नाही घेत बसत मी आत्ता. वडापाव खायला आम्ही सगळे बाहेर चाललो आहोत. आज जागतिक वडापाव दिन आहे ना, म्हणून.

आई : काय सांगतेस काय? वडापाव दिन? आणि तो जागतिक कधी पासून झाला? इथं केरळातल्या लोकांना तरी माहितीये का वडापाव. (आई आश्चर्य दाखवत हसते.)
(आई खुणेने शेजारच्या काकूंना चहा साठी खुर्चीवर बसायला सांगते)

आजीची मैत्रीण (पदमा मावशी) : (हसत) आजच झाला असेल. मुंबईचे वझे बंधू त्यांचा स्पेशल खिडकी वडा, चितळ्यांसारखाच जगभर पोचवतील व्हाट्सअँपवर जाहिरात करून. आणखी काय.

(सगळ्या जणी चहा घेत खुर्च्यांवर बसतात. )

शेजारच्या काकू : (आई कडे बघत) अगं, मला सकाळी गुड मॉर्निगच्या मेसेज मध्ये आजच्या जागतिक वडापाव दिनाचं कळलं. मग म्हटलं चला त्या निमित्ताने येऊ खाऊन.

आजी : यानं एक बाई फार डोकं उठतं. उठसूट गुडमॉर्निंग, गुडनाईट. जोडीला उडणारे पक्षी, फुलांच्या राशी तर कधी योग करणारी बाई, त्यात भर म्हणून कधी गौतम बुद्ध, तर कधी नेल्सन मंडेला, असं कुणाचं तरी उभ्या जन्मांत न पाळलं जाणारं तत्वज्ञान. नको नको होतं अगदी. समोर दिसल्यावर हसत नाहीत आणि व्हाट्सअँप वर काय करायचं डोंबल गुड मॉर्निंग.

आजीची मैत्रीण (पदमा मावशी) : हे बाकी खरंय गं. भरपूर काय काय वाचतो खरं व्हाट्सअँप वर. माझा चष्म्याचा नंबर पण वाढलाय बघ. पण वाचलेलं आमलात कोण कशाला आणतंय कधी.
(आईकडे बोट दाखवत) तूच परवा पाठवलीस ना ती कविता सोसायटीच्या ग्रुपवर. या व्हाटसअँप मुळे किती वेळ जातो, घराकडे कसं दुर्लक्ष होतं, सगळी कामं तशीच राहतात, या पिढीला व्हाट्सअँपचं पार वेड लागलंय वैगेरे सांगणारी. वाचून पटल्यामुळं त्यावर हसून पुढं चार जणांना फॉरवर्ड सुद्धा केली. पण व्हाट्सअँप वापरायचं कमी थोडीच झालंय. छे. सगळे दुसऱ्याला शहाणपण शिकवायला एका पायावर तयार. पण हातातला फोन स्वतः बाजूला ठेवायला मात्र सपशेल 'ना'! पुण्यात बसून अमेरिकेतल्या ट्रम्पबद्दल इंग्लंडातल्या मित्रांशी whatsapp ग्रुपवर चवीनं गप्पा मारतील. पण इथे शेजारी कोण बसलंय याचा मात्र पत्ता नाही. भेट ना गाठ ओन्ली व्हाट्सअँप वर चॅट. बाकी काय.

(पदमा मावशी हे सगळं बोलत असताना आई आणि शेजारच्या काकू मात्र whatsapp मध्ये बुडालेल्या. त्यांना मावशी बोलल्याचे काही ऐकू जात नाही. whatsapp च्या ज्वेलरी ग्रुप वर नुकत्याच पाठवलेल्या oxidised ज्वेलरीचे फोटो त्या एकमेकींना दाखवत असतात. आणि अचानक तेवढ्यात light जाते वायफाय बंद पडते. ओघानेच whatsapp ही बंद. तेव्हा कुठे आई wahtsapp मधून बाहेर येते आणि पदमा मावशींना विचारते.

आई : काय म्हणत होतात मावशी तुम्ही? माझं लक्षच नव्हतं.

पदमा मावशी : राहूदे राहूदे. तुमचं चालुद्यात whatsapp.
(यावर आजी आणि पदमा मावशी दिलखुलास हसतात. )


समाप्त


--- अश्विनी वैद्य
५. ०९. १८

Wednesday 20 June 2018

नाटक


" बीज जसे अंकुरते, मनी कल्पना येते
व्याकुळ होते, तीळ तीळ तुटते 
खोल कुठे गलबलते...!
कल्लोळात मनाच्या, वीज चमकूनी जाते
शब्दांचे अन् गीतांचे हे, झाड पुरे मोहरते....!

तिसरी घंटा होते, मखमल ही उलगडते
रंग रंगल्या अभिनेत्याचे भान हरपूनी जाते
कसली जादू होते, भारूनी सारे जाते
रसिकांसाठी आसू आणिक हासू देवूनी जाते...!

हा गौरव रंगकलेचा, हा गौरव कवी मनाचा
हे हृदयपुष्प रसिकांच्या चरणी अर्पण करणाऱ्यांचा...! "

    पाच सहा वर्षांपूर्वी हे गाणं मी झी मराठी वर नाट्यपुरस्कार सोहळ्याच्या उद्घटना वेळी ऐकलेलं, त्यातल्या या काही ओळी. श्रीरंग गोडबोले यांनी लिहिलेल्या या गाण्याच्या प्रत्येक शब्दाने मला त्यावेळी इतकी भुरळ घातली, की मी ते नंतर अखंड तासभर लूप मध्ये ऐकत बसलेले. कालच्या रविवारी एक नाटक इथे पाहायला गेलेले ते पाहून बाहेर पडताना गोडबोले यांच्या या गाण्याच्या ओळी परत आठवल्या. मग हे गाणं आज तितक्याच उत्कटतेने पुन्हा पुन्हा ऐकलं.

     नाटक बघणं हा माझ्या अत्यंत जिव्हाळ्याचा भाग. इथे परदेशात येवूनही ते पाहायला मिळतं हे खरंच खूप समाधानकारक वाटतं. नाटक हे पहिल्या रांगेत बसून पाहता यावं यासाठी मग नेहमी धडपड होते. ते पाहताना भान हरपून, मग्न होवून शब्दा शब्दात गढून जावून, त्या कलाकारांच्या अभिनयातून, चेहऱ्यावरच्या अगदी एकेका रेषेतून उमटणारे भाव टिपणं, त्या अभिनयाशी त्या क्षणी एकरूप होवून जाणं, अशा ताकदीची कलाकृती पाहायला मिळणं हे सुख वेगळंच. 

     नाटकाची तिसरी घंटा झाली की समोरचा लाल, कापडी पडदा हळुवार उघडला जातो आणि आपण एका वेगळ्या जगात पुढच्या दोन तासांसाठी फिरून येतो. जिवंत अभिनयातून समोर सादर होणारी ती सुंदर कलाकृती पुढचे दोन तास आपल्याला एका वेगळ्या विश्वात नेण्याची कमाल करते. अशीच इतर सगळ्या आजूबाजूच्या गोष्टींचा विसर पाडायला लावून समोर साकार होणाऱ्या शब्दकलेच्या, रंगभूमीच्या प्रेमात परत पडायला लावणारी आणखी एक कलाकृती कालच्या रविवारी पाहायला मिळाली. 

    दोन अंकी मराठी नाटक, 'अमर फोटो स्टुडिओ'. मराठी टीव्ही सिरीयल मधील नवीन, पण ओळखीचे चेहरे नाटकात दिसणार होते. या व्यतिरिक्त बाकी कसलीही म्हणजे नाटकाची कथा, आजवरच्या प्रयोगांची संख्या, इतर कोणाकडून नाटकाबद्दल आलेली प्रतिक्रिया अशी कसलीच माहिती आधी मुद्दाम न काढता मी नाटक बघायला गेलेले, पूर्ण कोऱ्या मनाने. कारण तरच लेखकाला  नाटकातून काय सांगायचे आहे हे (त्यातल्या अभिनयातून आणि संवाद लेखनातून) आपल्या पर्यंत पोचतंय की नाही ते ठरवता येते, असं मला तरी वाटतं. 

      असो तर, साधारण कथेचा मथळा असा. भविष्या बद्दल कसलीच शाश्वती मिळत नसल्याने निराशेतून गळफास घेवून आत्महत्या करण्याचा प्रयत्न करू पाहणारा नायक ' अपूर्व ' (सुव्रत जोशी) या प्रसंगाने पहिला अंक सुरू होतो. पुढच्या पाच मिनिटांत त्याची 'so cool' अशी आज- आत्ता - इथे याच तत्वाने जगू पाहणारी नायिका तनु (सखी गोखले) हिचा प्रवेश होतो.  

     सध्याची साधारण दर तासाभराने ' बोअर' होणारी, आयुष्या बद्दलचा फारच गहन विचार सतत करत राहूनही आपल्या आयुष्याचे इप्सित काय हे समजू न शकल्याने ऐन पंचविशीत दारुण नैराश्य वैगेरे आलेली, मोबाईल, इंटरनेट याच्या माध्यमातून सगळयातलं सगळं माहीत असायलाच हवं हा अट्टाहास करत, त्यातच स्वतःला हरवून शोधायला निघालेली, कपडे बदलावेत तसे जोडीदार बदलणं सोप्पं असतं या मतावर स्थिरावू पाहणारी, नात्यात stagnancy yetiy ki Kay asa vatun आधीच घाबरून ब्रेकअप करत कशातच खूप न अडकणं रास्त मानणारी, खरं प्रेम म्हणजे नक्की काय असतं, कसं असतं, कोणत्या नात्यात ते सापडतं, या विचारात पार गोंधळलेली, अशा खरंतर मोठ्या हुशार, उच्च शिक्षित पण अगदी बावचळून गेलेल्या पिढीचे प्रतिनिधित्व करणारे तरुण नायक आणि नायिका या नाटकात सुरवातीला उभे केले आहेत. जे खरंतर स्वतःच्या नात्याबद्दलच कन्फ्युज आहेत, आणि त्यामुळे चाचपडत आहेत असे साधारण चित्र नाटकाच्या सुरवातीला कधी हलक्या फुलक्या, कधी विनोदी तर कधी गंभीर संवादातून, वेगवेगळ्या प्रसंगातून समोर उभे राहते.

    तर असा आत्महत्येचा प्रयत्न करू पाहणाऱ्या अपूर्वची समजूत काढून त्याला अमेरिकेत PhD करण्याकरिता जाण्यासाठी लागणारे व्हिसाचे फोटो काढण्यासाठी तनु बाहेर घेऊन जाते आणि मग ते दोघे 'अमर फोटो स्टुडिओ' मध्ये येवून पोचतात. जिथे त्यांना फोटो स्टुडिओचे मालक जे अतिशय मिश्किल, भन्नाट विनोदी आणि तरुणांना लाजवतील इतके उत्साही असे अगदी young आजोबा (अमेय वाघ) भेटतात. एकमेकांचे सुंदर टायमिंग सांभाळत त्या तिघांमधील इथले संभाषण प्रेक्षकांना फारच धमाल आणते. तर ते आजोबा त्या दोघांचा त्यांच्या स्पेशल कॅमेरातून फोटो काढतात, आणि त्या बरोबर अपूर्व आणि तनु (त्यांना स्वतःला आणि प्रेक्षकांनाही काही समजायच्या आत)  2018 मधून एकदम जुन्या दोन वेगवेगळ्या काळात (भूतकाळात) जाऊन पोचतात. अपूर्व साल 1942 आणि तनु साल 1972 अशा दोन वेगवेगळ्या काळात. त्या काळात त्यांना त्यांचे तरुणपणीचे वडील, आजोबा भेटतात. नाटकात इथून त्या दोघांच्या अनोख्या सफरीला सुरुवात होते. ज्यांना त्यांचा भविष्यकाळ, जो खरंतर आत्तासाठी (२०१८ साठी) भूतकाळ आहे, पण ते स्वतः भूतकाळात गेल्याने तो relatively भविष्यकाळ होतो. सो त्या भविष्यात काय झाले आहे हे त्यांना आधीच माहीत आहे, अशा वेळी त्यांचा मनात होणारा गोंधळ, त्यांनी त्या भूतकाळात घेतलेले निर्णय, त्यांच्या आई बाबांचं त्या काळात असलेलं नातं, त्यांच्या न पटणाऱ्या गोष्टी, त्यांचे निर्णय, त्यांच्या मानसिकता, त्याची कारणं, त्यांचं वागणं अगदी सुंदर उभं केलं आहे. याच मूळ कल्पनेभोवती हे नाटक आहे. ही कल्पनाच खूप वेगळी असल्यामुळे प्रेक्षकांना भावते. या भूतकाळातल्या प्रवासात, हल्लीच्या तरुण पिढीला असणारी असंख्य टेन्शनस तरुणपणीच्या आपल्या वडिलांना सांगणाऱ्या ('तुमचं किती सोप्पं होतं, आमचं तसं नाहीये, खूप अवघड आहे, हे सांगतानाचा) सखीच्या एक खूप लांब लचक डायलॉग ने प्रेक्षकांच्या टाळ्या मिळवल्या.   

     १९४२ चा स्वातंत्र्या पूर्वीचा काळ दाखवताना अमेय वाघ याने व्ही शांताराम समोर उभे केले आहेत. पूजा ठोंबरे हिने खूप struggle करून पुढे येणाऱ्या त्या काळातल्या सिनेमात किरकोळ काम मिळणाऱ्या चंद्रिकेची भूमिका मस्त साकारली आहे. तिचा सुव्रत जोशी बरोबरचा डान्स नाटकात पाहायला अगदी सुंदर वाटतो. 
   

     ज्या जुन्या काळात सध्याचे techno world अस्तित्वातच नाहीये तिथे, मोबाईल, cloud स्टोरेज, angry बर्डस game या हल्लीच्या गोष्टींचा नाटकात खूप चपखल उल्लेख करून दोन्ही काळातले comparison करत मस्त संवाद लिहिले आहेत आणि कलाकारांनी ते साकारलेही उत्तम आहेत. भूतकाळात केलेल्या त्या सफरी नंतर जेव्हा अपूर्व आणि तनु आत्ताच्या काळात परततात तेव्हा त्यांना स्वतःच्या क्षुल्लक प्रॉब्लेम ला उगाच किती फुगवून ठेवलं होतं आणि त्यामुळं सुंदर नात्यात उगाच ताण आणले होते हे लक्षात येतं. या भूतकाळातल्या सफरी दरम्यान भविष्य माहित असूनही शाश्वती कसलीच नव्हती, त्यापेक्षा ते माहित नसताना त्या कोऱ्या पाटीवर खुल्या मनाने लिहीत राहण्यात, दिलखुलास जगत राहण्यातच मजा आहे हे  त्या दोघांना जाणवतं आणि त्या पॉईंटला नाटक संपतं.      


    नाटकात वेगवेगळे काळ दाखवताना, त्यातली माणसं आणि त्यांच्याशी या 2018 मधल्या माणसांचे interaction दाखवताना नाटकाचा flow कधी कधी थोडा हरवला आहे असं वाटतं. मध्येच सुंदर grip घेतलीये असं वाटेपर्यंत परत तो धागा सुटतो आणि वेगळाच भाग चालू झालाय असं होते. पण तरीही हे सगळे असे काळातील बदल नाटकाच्या सेट वर काही मिनिटात बदलणं आणि प्रेक्षकांना त्या काही मिनिटांत जुन्या काळात घेवून जाणं ते ही सिनेमातल्या सारख्या कुठल्याही डिजिटल टेक्नॉलॉजी शिवाय हे नाटकाच्या संपूर्ण टीमने खूप चांगलं जमावलंय. हा या जनरेशन चा वेगळा विषय छान हाताळला आहे. सर्वांनी उत्तम कामे केली आहेतच यात शंकाच नाही... खूप एनर्जेटिक. हे  नाटक बघून संपल्यावर हसऱ्या चेहऱ्याने आणि समाधानाने सोबत एक वेगळा विचार घेऊन आपण थिएटर मधून बाहेर पडतो. 

 --- अश्विनी वैद्य --- 
  २०/०६/१८

Wednesday 4 April 2018

महिला दिन



      जागतिक महिला दिनाच्या भरघोस शुभेच्छांचा आज दिवसभर नुसता पाऊस अनुभवला...अर्थातच व्हाट्सअँप आणि fb वर.... त्यावरचे अतिशियोक्त जोक्स, टिंगल कशालाच हल्ली कमी नसते सोशल मीडियावर. 

       आई, मावशी, काकू, आत्या, मैत्रिणी, मुली, सगळ्या जणींना हळदी कुंकूवाला असतो अगदी तसा उत्साह fb वर 'आम्ही महिला' या कॅटेगरीतले फोटो टाकण्यात किंवा महिला दिनाचा msg दुसऱ्या ग्रुप वर मनोभावे पुढे सरकावण्यात दिसत होता.... यात काही चुकीचे आहे असे मला अजिबातच म्हणायचे नाहीये. ज्या पिढीने 'बाई' म्हणून कायम एक पाऊल मागे राहण्याचा धर्म (उगाचच म्हणजे तसंच असतं असं मानून... किंवा कोणाच्या लादण्याने) स्वतःत रुजवला होता त्या पिढीला या अशा दिवसाचे अप्रूप वाटणारच. जागतिक महिला दिनानिमित्त वाचल्या गेलेल्या कविता, लेख त्यातून व्यक्त केलेल्या स्त्रीच्या वेगवेगळ्या प्रतिमा, तिचा त्याग,  यात कुठेतरी त्यांना स्वतःला relate करता आल्यानं असेल पण त्या वयातल्या आपल्या आई, मावश्या, यांच्या पिढीतल्या इतर बायका, मग त्या नोकरीतून रिटायर्ड झालेल्या का असेनात पण हा महिला दिन साजरा करण्याच्या निमित्तानं त्यांना इत्तर सगळ्यांकडून मिळालेलं अँप्रिसिएशन हवंसं वाटणं अगदी साहजिक आहे.(सासारी त्रास वैगेरे सहन केलेली ही शेवटची पिढी) असो.

        मागे पाच सहा वर्षांपूर्वी पहिल्यांदाच इंगंडला आलेल्या माझ्या एका मैत्रिणीच्या आईने त्यांचा अनुभव सांगितलेला, त्या इंग्लंडला आल्यानंतर जेमतेम महिन्याभराने मुलीच्या सांगण्यावरून त्यांच्या वयाच्याच अजून एका बाईंबरोबर त्या मॉल मध्ये शॉपिंगला गेलेल्या. दोघीचजणी. घरापासून एक बस बदलून तिथे पोचायचे होते. नवीन जागा, नवीन भाषा, वेगळे चलन...पण दोघीनी जमवले. भारतात, त्यांच्या गावात त्यांनी कधी एकटीने वाण सामान देखील आणले नव्हते की कसले पैशाचे व्यवहार स्वतः एकटीने कधीच बघितले नव्हते. त्या सगळ्यासाठी कायम 'नवरा'. शॉपिंग करून, परतीची बस पकडून, लेक कामावरून घरी येईपर्यंत त्या बरोबर पोचल्या परत. तेव्हा घरी आल्यावर काय आनंद झाला होता त्यांना.  त्या म्हणाल्या "माझ्यासाठी दुकानातून असं काहीच न आणून सुद्धा खूप काहीतरी मिळाल्यासारखं वाटलं होतं, त्या दिवशी मला. स्वतःच्या मर्जीने पैसे खर्च करण्यातला आनंद, स्वातंत्र्याचा आनंद, 'यांच्या' (नवऱ्या) शिवाय मलाही हे जमू शकतं याची स्वतःलाच पटलेली ओळख याचा आनंद... फार छान वाटलं होतं त्या दिवशी मला " असं त्या अगदी भरभरून सांगत होत्या. हे सगळं आत्ता आठवण्याचं कारण म्हणजे त्या पिढीचा जागतिक महिला दिन साजरा करण्या मागचा दृष्टिकोन या भावनेच्या अवती भोवतीच असेल कदाचित. तसं पाहिलं तर किती साधासा प्रसंग...पण त्यांना बरच काही देऊन गेलेला...जो आजवर पुरुषांपेक्षा आपण कमी या त्यांच्याच भावनेतून त्यांना कधीही न घेता आलेला, स्वतःबद्दलची माहित नसलेली बाजू स्वतःलाच समजावून गेलेला. हे अगदी महिला दिनादिवशीच व्हायला हवंय... असं नव्हे... किंवा या एकाच दिवशी नव्हे तर कायमच ती भावना जपता यायला हवी. स्वतःचा एक बाई पेक्षा एक व्यक्ती म्हणून आधी स्वतःने आणि इतरांनीही स्वीकार करावा हे atleast वर्षातून एकदा तरी लोकांना remind करण्याच्या निमित्ताने हा महिला दिन साजरा व्हावा असं या पिढीला वाटणं हे त्यांच्या दृष्टीने अगदीच अपेक्षित आहे.       

      सर्वानुमते ठरवलेले एक माप... 'पुरुष'. त्यांचं वागणं एक प्रमाण मग ते बरोबर असेल, वाईट असेल, जे असेल ते....पण समाजासाठी ते एक प्रमाण असतं. मग कोणी बाई भरधाव गाडी चालवते, तर "एखाद्या पुरुषाला लाजवेल इतकी छान गाडी चालवते ती...!" हा शेरा तिला मिळणं कितपत योग्य आहे किंवा कोणी खूप स्लो चालवत असेल तर, "बाईच चालवत असणार... बायकांना जमत नाही ते कशाला करतात कोण जाणे...! " असल्या प्रतिक्रिया ऐकायला मिळणं किती ठीक आहे? बाईच्या      
        कोणत्याही वर्तणुकीची 'पुरुष' या मापात बसणारी केलेली तुलनात्मक मोजणी... मग ते ड्रायविंग असेल, कुकिंग असेल, बिझिनेस सांभाळणे असेल, उच्चपदस्थ नोकरी करणं असेल, अगदी दारू पिणं असेल किंवा सिगिरेट ओढणंही असेल. 
         या सगळ्या वागण्याला ती एका व्यक्तीची वतर्णूक अशा दृष्टीने न बघता, हे एका बाईचं वागणं आहे अशा नजरेतून त्याचं मोजमाप ठरवणं...हे नकोय व्हायला. दारू पिणं, सिगारेटी ओढणं हे कोणीही केलं तरी वाईटच पण मुलींनी केलं कि, "ती मुलगी असून मुलांसारख्या सिगारेटी ओढते...!" ही कंमेंट बोचणारी आहे. पण केवळ ही दुय्यम भावना पुसण्याच्या उद्देशाने महिला दिन साजरा करणे हा हेतू ही योग्य नाही. एक बाई म्हणून नाही तर एक व्यक्ती म्हणून घेता आलेले विचार स्वातंत्र्य, व्यक्ती स्वातंत्र्य, आणि ते घेताना त्याबरोबर येणाऱ्या सगळ्या जबाबदाऱ्या स्वीकारण्याची पूर्ण तयारी, या सगळ्याची जाणीव, एक मुलगी, एक बाई म्हणून सतत दुसऱ्यांनी appriciate करण्याची अपेक्षा करत राहण्यापेक्षा आधी आपल्या स्वतःलाही स्वतःबद्दल प्रेम, रिस्पेक्ट वाटतोय ना हे समजण्याची कुवत या गोष्टींचे भानही या महिला दिनाच्या निमित्ताने महिलानांच यायला हवे कि काय असे वाटते.     

       सध्याची पिढी अर्थात सध्याच्या मुली ज्यांच्या साठी त्यांचा बाबा त्यांचा लहानपणापासूनचा हिरो होता/आहे, ज्यांच्या बाबाने त्यांचे परी सारखे लाड करून सुद्धा त्यांना खंबीर आणि कणखर बनवले आहे, अशा शिकलेल्या, स्वबळावर उभ्या असलेल्या मुलींना हा महिला दिन अजूनही साजरा करावा लागतो त्याबद्दल खंत वाटते. स्त्री आणि पुरुष या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, कोणीच कमी किंवा अधिक नाही, हे ऐकत, शिकत आणि स्वतःत रुजवत मोठ्या झालेल्या पिढीला  'अजूनही मुलींचं समाजातलं स्थान मुलांइतकंच महत्वाचं आहे', हे किंवा त्यांचे हक्कं, त्यांचे अधिकार या गोष्टी या दशकताही समाजाला पटवून द्याव्या लागतात त्याबद्दल खंत वाटते आणि मग हा महिला दिन साजरा करण्यात स्वारस्य वाटत नाही... जे त्यांच्या या दृष्टिकोनातून जराही चुकीचे नाही. पण लहान गावांमध्ये, खेड्यात अजूनही हे चित्र शहरांपेक्षा वेगळे नक्कीच आहे.     

       पुन्हा याचीच दुसरी बाजू म्हणजे आम्ही बायका, आम्ही मुली मुलांपेक्षा कशा वरचढ, आमच्या शिवाय काही होऊ शकत नाही, आमची थोर महती वैगेरे सांगण्यासाठी महिला दिन साजरा करणे आणि म्हणून वर्षातला हा एक दिवस महिलांना पार डोक्यावर घेऊन नाचायचे हे तर अगदीच हास्यास्पद आहे. किंवा एकीकडे  मुलगी म्हणून आरक्षणाचा फायदा घेऊन दुसरीकडे जेन्डर equality वर तावातावाने बोलणे, स्वतःच्या स्त्रीत्वाचे पोवाडे गात फिरणे, हे अगदीच कमीपणाचं आहे. हा विरोधाभास अनुभवावा लागल्याबद्दल स्वतःचीच कीव येण्यापलीकडे यातून काहीही सिद्ध झालेले नाही हेच लक्षात येईल.       

       महिला दिन साजरा करणे न करणे या बद्दल, प्रत्येकाची भूमिका वेगळी असेल, मते वेगळी असतील. पण आज सोशल मीडियावर वाचलेल्या अनेक शुभेच्छा बघून, आनंद, राग, उपहास, हास्य आणि शेवटी केविलवाणेपणा असे मिश्र भाव मनात आले आणि वरचे माझे मत लिहावे वाटले. 
वाचल्याबद्दल धन्यवाद.  

अश्विनी वैद्य 
८ मार्च २०१८ 

(टीप : यात wiki वर खरडलेला UN चा जागतिक महिला दिनाबद्दलचा इतिहास मी वर कुठे कुरतडण्याचा प्रयत्न मुद्दाम केलेला नाही... तसेही आम्ही भारतीय प्रत्येक गोष्टीला एक इमोशनल टच देण्यात अगदी पटाईत. त्यामुळे इंग्लंडात (जिथे IWD बद्दल फारसे कोणाला काही माहितही करून घ्यायचे नाही अशा ठिकाणी) बसून जागतिक महिला दिनाच्या भारतीय (महाराष्ट्रीय (पुणे/ मुंबई)) version बद्दल माझी मते मांडण्याचा आगाऊपण केला आहे.  त्यामुळं न पटल्यास... जाऊदे...देवू सोडून... तसाही संपला आता महिला दिन... !)

राजस्थान डायरी : उदयपूर

उदयपूर - कॅपिटल ऑफ मेवाड - City of lakes, झिलों का शहर असलेल्या राजस्थान मधील या सुंदर ऐतिहासिक शहराला भेट देणं म्हणजे कला, राजस्थानी स्थाप...