Thursday 11 August 2016

लंडन-पुणे-लंडन


    मुंबईला विमानातून उतरल्यावर सगळे सोपस्कार पार पाडून बाहेर आले आणि दमट हवेची एक झुळूक मला हलकेच येवून बिलगली, तेव्हा त्याला चिकटलेला भूतकाळ एकदम असा क्षणात समोर उभा राहिला.

    Zara, Armani, H&M, Debenhams, Walis, D&G, Hugo Boss, TopShop अशा चकचकाट, झगमगाट नि लखलखाट या टकारान्त शब्दांच्या चौकटीत ज्यांचं वर्णन चोख बसावं अशी outlets असलेला टकटकीत देश विमानानं सोडला होता आणि मी सरळ चामुंडा गिफ्ट आर्टिकल्स, अंबिका ज्यूस सेंटर, नागराज मेटल मार्ट, गोरे व्हिडिओ शूटिंग आणि फोटोज, तुळजाभवानी लौंड्री, महालक्ष्मी इडली गृह, स्वामी शूज, कालिदास डेअरी फार्म अशी एक से बढकर एक अस्सल मायदेशी, एका शेजारी एक वर्षानुवर्षे सुखानं नांदणारी, पिढ्या न पिढ्या चालणारी दुकानं असलेल्या रोडवर येऊन पोचले होते.



   रस्त्याच्या कडेने समोरासमोर असणारी ही भरगच्च दुकानं, संध्याकाळच्या वेळेला त्यातून हवेत विरत जाणारी उदबत्त्यांच्या धुराची वलयं, आजुबाजूला माणसांची प्रचंड गर्दी, त्यांचे बोली भाषेतील वेगवेगळ्या टोन मधले संवाद , त्या नुसार बदलणारे त्यांचेे चेहरऱ्यावरचे हावभाव, भरधाव नाही पण जागा मिळेल तिथून वाट काढत धावणाऱ्या रिक्षा, बाइक्स, बसेस, चौकातल्या कोपऱ्यावर उभे असलेले फळांचे गाडे, बाजूला रिक्षेसाठी हात करत उभी असलेली चार दोन मंडळी, त्याच चौकात अगदीच दुर्लक्षिलेले, दर काही सेकंदाने लुकलुकणारे लाल, पिवळे, हिरवे दिवे, तिथून येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाकडे बघत स्वतःच्या वाढदिवसानिमित्त मोठ्ठया होर्डिंग मधून अगदी गोड हसणारे कुलदीप घोडे, नागेशभाऊ धोतरे, रजनीताई पिसे नामक दादा, ताई, काका, आक्का. हा असा सगळा माहोल, अशी गर्दी, हा सगळा गोंधळ, ही दमट धुराळलेली हवा, त्यात भरलेला तो एक प्रकारचा वास, एकूणच या सगळ्या वातावरणात असलेला एक ठसठशीत जिवंतपणा, चैतन्य, एक वाहतेपण आज खूप दिवसांनी अनुभवत होते. आधी जगलेल्या अशा बऱ्याच क्षणांशी, आठवणींशी स्वतःला जोडत होते. कदाचित त्यामुळंच पूर्वी खूप त्रासिक वाटणाऱ्या याच सगळ्या गोष्टी आज अगदी जवळच्या वाटत होत्या. आपल्या वाटत होत्या. क्षणांचं महत्व समजायला त्यांना आठवणींचंच रूप घ्यावं लागत असावं. तेव्हाच त्याचं मोल जाणवतं. शेवटी मध्यमवर्गीय विचारांची झेप जाणार तरी कुठंवर म्हणा...अशा आनंदाच्या, समाधानाच्या कल्पनांची नांदी या अशा हाकेच्या अंतरावर वसलेल्या छोट्याशाच चौकटीत मावणारी.


लक्ष लक्ष वेळ तुला रिकामेच पाठवावे,
लक्ष लक्ष वेळा तुला आठवावे साठवावे,
पहाटेच्या कळ्यांपाशी थोडे मागावे इमान,
थोडे सांगावे तुलाही माझ्या मनाचे प्रमाण,
लक्ष लक्ष तू अन लक्ष लक्ष वेळ,
मी एक अनंताचे चुकले पाऊल.

  खानोलकरांच्या या ओळी दर वेळी नवीन अर्थाने मला आठवतात. आज त्या पुन्हा एकदा रितेपण देणाऱ्या वाटल्या.

  बाकी काहीही असो, पण या सगळ्यामुळे, घर, उब, माया या शब्दांभोवती फिरणारे विचार त्या वेळी तरी आत कुठेतरी विसावलेत ही जाणीव परत जागी झाली आणि त्यामुळं कदाचित विसावण्याचं समाधान आणि समाधानानं विसावणं याच्या अगदी बारीकशा सीमारेषेवर मनात कायमच चाललेल्या द्वंद्वाला थोड्यावेळासाठी तरी एक पक्की बाजू मिळाली.


असो, तर रोजच्या घड्याळाच्या काट्यावर चालणाऱ्या routine ला सुखाने फाटा देत, खाणे, फिरणे आणि झोपणे या त्रिकुटात बसवलेल्या, घड्याळाशी काहीही संबंध नसलेल्याने पार ढेपाळलेल्या दिनक्रमाचा सुखाने आनंद लुटणे चालू झाले. मागच्या वेळीपेक्षा बदलत गेलेला आजूबाजूचा परिसर यावर कसलीच टिपण्णी न करता त्याचा केवळ सुखाने आनंद लुटणे या सारखी मजा नाही. अशा रितीने आता इथे आल्यावर करायच्या गोष्टींची यादी हळू हळू संपवण्याचा दिनक्रम पार पाडायला सुरवात केली आहे.

अश्विनी वैद्य 
१०.०८.१६ 

राजस्थान डायरी : उदयपूर

उदयपूर - कॅपिटल ऑफ मेवाड - City of lakes, झिलों का शहर असलेल्या राजस्थान मधील या सुंदर ऐतिहासिक शहराला भेट देणं म्हणजे कला, राजस्थानी स्थाप...